फोटो १५ जयदीप पाटील
फोटो १५ सिद्धी घोडके
फोटो १५ दत्तात्रय रेवे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दहा-अकरा महिन्यांच्या प्रदीर्घ सुटीनंतर जिल्ह्यातील महाविद्यालये सोमवारी सुरू झाली. शैक्षणिक कामकाज, वेळापत्रक, परीक्षा या सर्वच बाबतीत संदिग्धता असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती जेमतेम राहिली. सर्रास महाविद्यालयांत ४० ते ५० टक्केच विद्यार्थी हजर होते.
विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांच्या पाठपुराव्यानंतर सोमवारपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पण, पहिल्याच दिवशी ती पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाहीत. कोरोनाविषयक काळजी घेताना महाविद्यालयांनी मास्कची सक्ती, सॅनिटायझरचा वापर, तापमानाची नोंद इत्यादी खबरदारी घेतली. शासनानेही पटाच्या ५० टक्केच उपस्थितीची अट घातली होती. पण, सोमवारची एकूण उपस्थितीच ५० टक्के राहिली. वर्गात एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवला होता.
काही महाविद्यालयांनी वेगवेगळ्या वर्गांची वेगवेगळी वेळापत्रके तयार केली होती. एक वर्ग सकाळी तर दुसरा दुपारच्या सत्रात घेतल्याने कॅम्पसमध्ये विशेष गर्दी झाली नाही. जिल्ह्यात सर्व म्हणजे ९० महाविद्यालये सुरु झाली, पण सर्वच ठिकाणी उपस्थिती जेमतेम होती. तुलनेने विद्यार्थनींची संख्या जास्त आढळली. शैक्षणिक कामकाजाविषयी शासनाचे आदेश संदिग्ध असल्याचाही परिणाम झाला. उपस्थिती सक्तीची नसल्यानेही विद्यार्थी ऑनलाइनवर विसंबून राहिले. ५ नोव्हेंबरपूर्वीच्या परिपत्रकांचे पालन करावे, असे सांगितले आहे. पण, परीक्षेचे दिवस तोंडावर असल्याने त्यातील अनेक परिपत्रके कालबाह्य ठरणार असल्याचाही महाविद्यालयांचा दावा आहे. मार्चपासून विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चौकट
मास्कशिवाय प्रवेश नाही
कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचना पाळताना महाविद्यालयांनी विद्यार्थी व प्राध्यापकांना मास्कची सक्ती केली. मास्कशिवाय वर्गात प्रवेश दिला नाही. प्राध्यापकांनीही मास्क घालूनच अध्यापन केले. काही महाविद्यालयांनी गेटवरच सुरक्षारक्षकाकडे सॅनिटायझर ठेवले होते. वर्गात मास्क सांभाळणारे विद्यार्थी बाहेर पडल्यावर मात्र बिनधास्त झाल्याचे आढळले. दहा-अकरा महिन्यांच्या प्रदीर्घ सुटीनंतरचा पहिलाच दिवस सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्ये विद्यार्थी दिसले.
कोट
पहिला दिवस उत्साहाचा होता. ऑनलाइन अभ्यासाऐवजी प्रत्यक्ष वर्गातील अभ्यास चांगला वाटला. हजेरी सक्तीची करावी, त्यामुळे उपस्थिती वाढेल.
जयदीप पाटील, विलिंग्डन महाविद्यालय
कोट
परीक्षेच्या दिवसांत पुन्हा नव्याने शिक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे वर्गात शिकवण्याकडे लक्ष द्यायचे की परीक्षेची तयारी करायची, हा संभ्रम राहिला. पण, पहिला दिवस उत्साहाचा वाटला.
- सिद्धी घोडके, जयसिंगपूर महाविद्यालय
कोट
शासनाने महाविद्यालये यापूर्वीच सुरू करायला हवी होती. यामुळे शैक्षणिक नुकसान टळले असते. आता १०० टक्के अभ्यासक्रमानंतरच परीक्षा घ्याव्यात. वर्ग सुरू झाल्याने अभ्यास परिपूर्ण होईल.
- दत्तात्रेय रेवे, वालचंद महाविद्यालय
कोट
शासनाने परिपत्रकातील संदिग्धता दूर करावी
कोरोनाविषयक खबरदारी व पालकांची संमतीपत्रे घेऊनच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला. पहिलाच दिवस असल्याने उपस्थिती १०० टक्के नव्हती. पन्नास टक्के उपस्थिती होती. विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रकात बदल केले आहेत. शासनाने परीक्षा, उपस्थितीची सक्ती आदींंविषयीच्या परिपत्रकांतील संदिग्धता दूर केली पाहिजे. स्पष्ट आदेश दिल्यास पूर्ण क्षमतेने महाविद्यालये सुरू होऊ शकतील.
- प्रा. भास्कर ताम्हणकर, विलिंग्डन महाविद्यालय
पॉइंटर्स
जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये - ९०
सुरू झालेली महाविद्यालये - ९०
पहिल्या दिवशी उपस्थिती - ४० ते ५० टक्के
तालुकानिहाय सुरू झालेली महाविद्यालये
मिरज - ३४
वाळवा - २२
खानापूर - ९
आटपाडी - ५
जत - ४
पलूस - ४
तासगाव - ४
शिराळा - ४
कवठेमहांकाळ - २
कडेगाव - २.