पुनवत : कणदूर (ता. शिराळा) येथे कायमस्वरूपी वायरमनच नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. विजेच्या खोळंब्यात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने येथे वायरमनची त्वरित नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.
कणदूर हे पाच हजार लोकसंख्येचे गाव असून, गेल्या काही काळापासून येथे अधिकृत वायरमन नाही. मोठ्या लोकसंख्येचे गाव असूनही कणदूरला वायरमन नाही. सुरळीत वीजसेवा मिळत नाही. महावितरणने याची ताबडतोब दखल घ्यावी व नागरिकांची समस्या सोडवावी, अशी मागणी सरपंच शोभाताई पाटील यांनी केली आहे.
सागाव कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावांसाठी आवश्यकतेप्रमाणे कर्मचारी उपलब्ध नाहीत. काही पदे रिक्त असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. कायमस्वरूपी कर्मचारी मिळेपर्यंत दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एका कायम कर्मचाऱ्यावर कणदूर गावची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे, अशी माहिती महावितरणचे कनिष्ठ अभियंता कैलास जगताप यांनी दिली.