दत्ता पाटील -तासगाव,तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच आता भाजपलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. दोन्ही तालुक्यातील वर्चस्वाच्या छुप्या अजेंड्यावर खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची वाटचाल सुरू आहे. पक्षप्रवेशाच्या निमित्तानेही येणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाबरोबरच नेत्यांच्या नावाचा टिळाही लावण्यात येत असल्याने संघर्षाची ही कहाणी आता रंगात आली आहे. जिल्ह्यात येईल त्याला घेऊन भाजपने लोकसभेपाठोपाठ विधानसभेलादेखील चार मतदारसंघात कमळ फुलविले. मात्र तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात दोन बिनीचे शिलेदार खिंड लढवत असतानादेखील कमळ फुलले नाही. तेव्हापासून याची खंत मनात बोचत असलेल्या माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी खासदार संजयकाकांशी फारकत घेतली. स्थानिक निवडणुकांत दोन्ही नेत्यांतील दुरावा स्पष्टही झाला. मात्र दोघांनीही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला नाही. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात दोघांतील अंतर्गत खदखद स्पष्ट होणार नाही, अशी अपेक्षा भाजपची स्थानिक मंडळी बाळगून होती. मात्र दानवेंच्या दौऱ्यातदेखील काका आणि सरकारांचा सवतासुभा कायमच राहिला आहे. मुळातच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या दौऱ्याचा एकूण रागरंग ‘संजयकाका लिमिटेड’ असाच होता. यानिमित्ताने संजयकाकांनी जिल्ह्यावरील नेतृत्वासाठीचे बळ आपल्यात असल्याचे संकेत दिले. मात्र हे करीत असताना त्यांचे टार्गेट तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघच होते. जिल्ह्याचा मेळावा तासगावात, तर दुष्काळ पाहणीचा दौरा कवठेमहांकाळ तालुक्यात (नागज) झाला. कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांना वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेसाठी ५० कोटींचा निधी पदरात (तूर्तास आश्वासन) पाडून घेत, काकांनी कवठेमहांकाळकरांसाठी सत्ताचुंबक आपल्या ताब्यात असल्याची चुणूकही दाखवून दिली. इतकेच नाही, तर आबा गटातील हायूम सावनूरकर, दादासाहेब कोळेकर आणि अनिल शिंंदे या तिघांशी नवी सोयरिक जुळवून, कवठेमहांकाळमध्ये स्वत:ची तटबंदी उभी राहिल्याचेही दाखवून दिले.दुसरीकडे अजिराव घोरपडेंनी प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याच्या एक दिवसआधीच भाजपचा खुट्टा हालवून घट्ट केला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार पतंगराव कदमांच्या बरोबरीने सर्व पक्षीय आघाडीतून घारपडेंनी निवडणूक लढवली होती. निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतरही त्यांनी भाजपचा जयघोष केला नव्हता. मात्र प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच सांगली बाजार समितीत भाजपची ताकद असल्याचे स्पष्ट केले. मिरज पूर्वसह कवठेमहांकाळ तालुक्यात घोरपडेंची भाजप सत्तावान असल्याचेच त्यांनी यानिमित्ताने दाखवून दिले. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांच्या कवठेमहांकाळ तालुक्याच्या दौऱ्यात खासदारांशी अंतर ठेवूनच घोरपडे सहभागी होते. नागजमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर पक्षाच्या सर्वच नेत्यांनी तासगाव येथे होणाऱ्या पक्षाच्या जिल्हा मेळाव्याची वाट धरली असताना घोरपडे सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी तिकडे पाठ फिरवून, त्या ङ्गगावालाङ्घ आपल्याला जायचेच नसल्याचे दाखवून देत, खासदारांशी असलेली आगळीक कायम ठेवली.आतापर्यंत सलग पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमधील गटबाजीचे सातत्याने प्रत्यंतर येत होते. मात्र आता शिस्तप्रिय असलेल्या भाजपमध्येही गटबाजीची लागण झाल्याचे, प्रदेशाध्यक्ष दानवेंनी याचीदेही याचीडोळा अनुभवले. त्यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही नेत्यांच्या राजकारणाचे पारडे भाजपच्या सत्तेच्या तराजूत कसे तोलले जाणार, हे लवकरच स्पष्ट होईल.सत्ताचुंबक कोणाकडे? सध्या भाजपकडे केंद्रातील व राज्यातील सत्ता आहे. या सत्तेच्या जोरावर भविष्यातील राजकारणाची मजबूत बांधणी करण्याची संधी खासदार संजयकाका आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचेही काही आडाखे आहेत. कुणाच्या पारड्यात किती वजन आणि सत्तेचे माप टाकायचे, या साऱ्या गोष्टीचे ‘परफेक्ट प्लॅनिंग’ असल्यास नवल नाही. कदाचित म्हणूनच दानवे यांनी मंत्रीपद केंद्रात की राज्यात? असा नवा प्रश्न निर्माण केलाय. प्रदेशाध्यक्षांच्या पहिल्याच दौऱ्याच्यानिमित्ताने खासदारांनी सत्तेचा चुंबक आपल्याकडे फिरला असल्याची चुणूक दाखवून दिली, तर घोरपडेंनी सांगली बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपले शक्तिप्रदर्शन करुन भाजपच्या सत्ताचुंबकाचे लक्ष वेधून घेतले. राज्यातील सत्तेचा लाभ मिळविण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून येणाऱ्या काळात आटोकाट प्रयत्न होणार, हे निश्चित आहे. त्याचा फायदा नेमका कोणाला होणार, याची उत्सुकता मात्र कायम आहे.
काका-सरकारांचा वर्चस्वाचा छुपा अजेंडा
By admin | Updated: August 30, 2015 22:40 IST