अशोक पाटील --इस्लामपूर -आगामी पाच वर्षांसाठी जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी कोणतेही आरक्षण पडले, तरी सत्ताधाऱ्यांकडे एकही नेता असा नाही, की तो स्वबळावर नगराध्यक्षपद मिळवू शकतो. ज्याच्या डोक्यावर आमदार जयंत पाटील यांचा वरदहस्त असेल, तोच भावी नगराध्यक्ष ठरणार आहे. याउलट विरोधी गटाचे मार्गदर्शक नेते, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी कितीही प्रयत्न केला तरी, विरोधकांकडे सक्षम चेहरा नसल्याने जनेततून निवडून द्यावयाच्या नगराध्यक्ष निवडणुकीत जवळजवळ राष्ट्रवादीच बाजी मारणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.युती शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांची ताकद विरोधकांच्या पाठीशी होती. त्यामुळेच जनतेतून नगराध्यक्ष निवडीवेळी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्याविरोधात आनंदराव मलगुंडे यांनी मोठे आव्हान उभे केले होते. आता हे दोघेही जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून राष्ट्रवादीत कार्यरत आहेत. या दोघांनाही आता नगराध्यक्ष होण्याचा ध्यास लागला आहे. जर नगराध्यक्ष पदासाठी ओ. बी. सी. आरक्षण पडले, तर आनंदराव मलगुंडे, चिमण डांगे आणि संजय कोरे यांचा विचार राष्ट्रवादीतून होऊ शकतो.खुल्या पुरुष गटासाठी आतापासूनच विजयभाऊ पाटील यांचे नाव घेतले जात आहे. परंतु विजय पाटील हे नगराध्यक्ष पदासाठी चालणारच नाहीत, अशी चर्चा दबक्या आवाजात त्यांचेच काही हितचिंतक करू लागले आहेत. असे असले तरी राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील हे पक्षाने संधी दिल्यास नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार आहेत. अन्यथा ते स्वत:च्या प्रभागात काय आरक्षण पडते यावर लक्ष ठेवून आहेत. यावरुन त्यांची रणनीती ठरणार आहे. महिलांमधून माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांचे नाव घेतले जाते. या नावाला विरोध करण्यासाठी कोणतीही महिला पुढे येण्याची चिन्हे सध्या तरी नाहीत.नवख्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचारही जयंत पाटील यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. याउलट विरोधी गटाची अवस्था दयनीय आहे. खा. राजू शेट्टी यांनी कितीही प्रयत्न केला तरी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि इतर घटकपक्षांच्या नेत्यांचे मनोमीलन झाले तरीही अंतिम टप्प्यात वादाला तोंड फुटते, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी एल. एन. शहा यांचे नाव घेतले जात आहे. त्यांना विरोधकांची कितपत साथ मिळेल, यावरच सर्वकाही अवलंबून आहे....तर विरोधकांना चांगले दिवस येतील येणाऱ्या काळात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. या दोघांची ताकद इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत एकवटली, तर विरोधकांना चांगले दिवस येतील. परंतु शहरातील गट नेत्यांच्यातच अंतर्गत मतभेद असल्याने विरोधकांकडे ताकद असूनही त्याचा योग्य वापर होऊ शकत नाही.
जयंतरावांच्या ताकदीवरच नगराध्यक्ष ठरणार
By admin | Updated: May 23, 2016 00:19 IST