सांगली : विधायक अर्थकारणाच्या माध्यमातून सभासदांसाठी वीराचार्य जीवन सुरक्षा ठेव योजना, अपघाती विमा योजना, शैक्षणिक सहाय्य योजना, लेक वाचवा योजना अशा सामाजिक बांधिलकीची जपणूक करणारी वीराचार्य पतसंस्था सहकारी संस्थांसाठी पथदर्शी व दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी केले.
वीराचार्य पतसंस्थेच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन सभेत ते बोलत होते. उपाध्यक्ष जयकुमार बेले यांनी स्वागत केले. राजोबा म्हणाले की, संस्थेची वाटचाल अडीचशे कोटीच्या ठेवीकडे सुरू आहे. शून्य टक्के एनपीएची परंपरा कायम राखून १२ टक्के लाभांश दिला आहे. महापूर, कोरोनाच्या काळाताही वीराचार्य परिवाराने नागरिकांना मोठी मदत केली होती. संकटाच्या काळात वीराचार्य पतसंस्था नेहमीच सभासदांच्या पाठीशी राहिल्याचे सांगितले. डाॅ. अजित पाटील यांनी गेली २८ वर्षे वीराचार्यांच्या विचाराने संस्थेने समाजाभिमुख उपक्रम राबविले असल्याचे सांगितले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिवंगत संचालक आदगोंडा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संचालक राजाराम हराळे यांनी आभार मानले.