लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्यातील बारा बलुतेदारांना शासनाने स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
यात म्हटले आहे की, राज्यात लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु नाभिक, सुतार, कुंभार, शिंपी, परीट इत्यादी बारा बलुतेदारांमधील छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहे. त्यामुळे हा समाज आर्थिक अडचणीत आला आहे. या समाजावर उपासमारीची पाळी आलेली आहे. शासनाने रिक्षाचालक, बांधकाम मजूर, फेरीवाले यांना आर्थिक साहाय्य जाहीर केले. बारा बलुतेदारांसाठी कुठलेही आर्थिक साहाय्य जाहीर केले नाही.
या कुटुंबांना पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे. तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांना बेड कमी पडत आहेत. त्यासाठी तालुकापातळीवर कोविड सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष अमर पडळकर, सरचिटणीस उदय बेलवलकर, सरचिटणीस सचिन पोतदार, युवा अध्यक्ष राहुल माने, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद वळकुंडे, गजानन मोरे, नाना मगदूम उपस्थित होते.