सांगली : येथील संजयनगरमधील चैतन्यनगर येथे शुक्रवारी पहाटे चार चोरट्यांनी धुमाकूळ घातला. घरावर दगडफेक करीत निरंकार कॉलनीतील विष्णू जगन्नाथ तेवरे यांचे किराणा मालाचे दुकान फोडून पाचशे रुपयांचा माल लंपास केला. त्यांची रिक्षाही पळविली. लोकांच्या घरांना बाहेरुन कड्या लावल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तरुणांनी चोरट्यांचा शोध सुरू ठेवला. सकाळी साडेसहा वाजता एका चोरट्यास माधवनगर (ता. मिरज) येथील रेल्वे स्थानकावर पकडण्यात यश आले. मात्र त्याच्या तीन साथीदारांनी पलायन केले. अजय बापू कांबळे (वय २४, रा. वाल्मिकी आवास वसाहत, जुना बुधगाव रस्ता, सांगली) असे पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. तरुणांनी त्यास बेदम चोप दिला आहे, तर पवन धर्मेंद्र साळुंखे, विक्या जाधव-गोसावी व बाट्या कांबळे अशी पळून गेलेल्या त्याच्या साथीदारांची नावे आहेत. तेही वाल्मिकी आवासमध्ये राहतात. त्यांनी चोरलेली रिक्षा (क्र. एमएच १० के १७१६) जप्त केली आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. मारहाणीत जखमी झालेल्या अजय कांबळे याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चैतन्यनगरमध्ये पहाटे तीन वाजता चौघांनी विष्णू तेवरे यांच्यासह परिसरातील अनेकांच्या घराला बाहेरुन कड्या लावल्या. काही घरांवर दगडफेक केली. खिडक्यांवर बॅटरीचा प्रकाश पाडला. त्यानंतर तेवरे यांच्या किराणा मालाच्या दुकाच्या शटर्सची कुलपे तोडून त्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील पाचशे रुपयांचे किराणा साहित्य चोरले. हे साहित्य त्यांनी तेवरे यांच्या रिक्षात भरले व रिक्षा सुरु करुन त्यांनी पलायन केले. दरवाजाला बाहेरुन कड्या असल्याचे लक्षात येताच लोकांनी शेजाऱ्यांशी मोबाईलवरुन संपर्क साधला. चोर आल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे चैतन्यनगर, यशवंतनगर परिसरातील तरुण जमा झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध सुरू ठेवला. वसंतदादा औद्योगिक वसाहत, संपत चौक, साखर कारखाना परिसर, पंचशीलनगर, रेपे प्लॉट, लक्ष्मीनगर याठिकाणी संशयित चोरट्यांचा शोध घेण्यात आला. तरुणांची फौज सकाळचे साडेसहा वाजले तरी चोरट्यांचा शोध घेत होती. माधवनगर येथे रेल्वे फाटकाजवळ तेवरे यांची चोरलेली रिक्षा असल्याचे समजताच तरुण तिकडे गेले. चोरटे माधवनगर स्थानकावर असतील, असा अंदाज करुन तेथे गेले. त्यावेळी चौघे तिथे बसले होते. हेच ते चौघे असतील असा अंदाज करुन त्यांना पकडण्यासाठी ते गेले. त्यावेळी पवन धर्मेंद्र साळुंखे, विक्या जाधव-गोसावी व बाट्या कांबळे या तिघांनी पलायन केले. अजय कांबळे यास पकडण्यात यश आले. त्याला बेदम चोप देण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे, उपनिरीक्षक एन. आर. एकशिंगे दाखल झाले. त्यांनी संशयित कांबळेला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याने चोरीची कबुली देऊन साथीदारांची नावे सांगितली. साथीदारांच्या शोधासाठी शहरात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले, पण ते सापडले नाहीत. (प्रतिनिधी)
सांगलीत चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ
By admin | Updated: August 22, 2015 00:51 IST