मिरज तालुक्यात २०१६-१७ ते २०१९-२० पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेची १९८१ घरकुले मंजूर होती. मात्र, तत्कालीन अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याअभावी व लाभार्थ्यांच्या दिरंगाईने ती गेली चार वर्षे रखडली होती. घरकुले रखडल्याचा फटका नवीन घरकुल मंजुरीला बसत राहिला. गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी मिरज पंचायत समितीचा २०१९ला कारभार हाती घेतला. दोन वर्षांत रखडलेल्या घरकुलांचा विषय हाताळताना, त्यांनी घरकूल योजनेचे विस्तार अधिकारी संतोष इंगळे, लिपिक एस.वाय. गंगथडे व त्या-त्या गावचे ग्रामसेवक यांच्या सहकार्याने प्रधानमंत्री आवास योजनेची १९८१ पैकी १,४९४ घरकुले पूर्ण केली, तर ४८७ घरकुलांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे घरकुले पूर्ण झाल्याने नवीन घरकुल मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे, तसेच प्रस्तावातील अडचणींसह इतर कारणांनी ‘रमाई घरकूल’च्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळण्यात अडचणी होत्या. सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे हप्ते मिळण्यासाठी पाठपुरावा सतत पाठपुरावा केला, तर याच प्रश्नी सदस्य किरण बंडगर यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी हाही विषय सोडविला.
चौकट
रमाई घरकुलाचे हप्ते वर्ग : सरगर
रमाई घरकूल योजनेसाठी २०३ लाभार्थ्यांंची निवड झाली आहे, पैकी ७९ घरकुल अनुदानाचे हप्ते लाभार्थ्यांंच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित प्रस्तावातील त्रुटी दूर करून, त्यांनाही अनुदानाचा हप्ता वर्ग करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी सांगितले.