२०१९ च्या तुलनेत कृष्णाघाटमध्ये यंदा पुराने झालेली हानी अत्यंत कमी आहे. जुना अनुभव गाठीशी असलेल्या रहिवाशांनी नदीचा रुद्रावतार पाहून अगोरदच घरे रिकामी केली. जनावरांना मिरजेत नेऊन बांधले. त्यामुळे जीवित आणि वित्तहानी फार झाली नाही. पूर ओसरल्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा घरे गजबजली. शेती मात्र होत्याची नव्हती झाली. उभी पिके मातीसह कृष्णार्पण झाली. आता पुन्हा घडी बसविण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. पंचनाम्याला आलेले शासकीय कर्मचारी सतराशे साठ अटी आणि शर्ती सांगताहेत. सरकारी मदत पुन्हा उभा राहण्यासाठी पुरेशी नसली तरी शासनदरबारी पूरग्रस्त म्हणून नोंदीसाठी उपयुक्त ठरते. पण प्रशासन नेमके हेच नाकारत आहे. घराला चोहोबाजूंनी आठवडाभर कृष्णेचा वेढा होता, पण दुसऱ्या मजल्यावर राहत असल्याने पूरग्रस्त नाही असे शिक्कामोर्तब प्रशासन करत आहे. अशा अडचणींना तोंड देतच सावरण्याचा प्रयत्न घाटावरचे रहिवासी करताहेत.
कृष्णाघाटावर महापूर ओसरला, आता संघर्ष प्रशासनाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST