सांगली : रिझर्व्ह बँकेने दोन वर्षांपूर्वी वापरात आणलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटांचा रंग उडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा रंग उडालेल्या नोटा परत करण्याऐवजी अनेक बँकांकडून त्या पुन्हा चलनात आणल्या जात असल्याने ही समस्या दिवसेंदिवस डोकेदुखीची होत आहे.
रिझर्व्ह बँकेने क्लिन नोट पॉलिसी व नोट रिफंड रुलद्वारे देशभरातील सर्व बँकांना नोटांच्या व्यवहारांबाबत व खराब झालेल्या नोटांच्या परताव्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तरीही या सूचनांचे पालन केले जात नाही. दुसरीकडे नव्याने चलनात आलेल्या नोटांचा रंग उडत असल्याने नागरिकांना त्याचा मनस्ताप होत आहे.
चौकट
काही ठिकाणी रंग उडालेल्या, मळक्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत, तर अनेक वित्तीय संस्थांकडून त्या ग्राहकांना थोपविल्या जात आहेत. त्यामुळे त्या वारंवार चलनात येत आहेत. वास्तविक नागरिकांना कमी प्रमाणात असलेल्या या नोटा बदलण्यास अवधी नसतो, त्यामुळे बँकांकडूनच या नोटा करन्सी चेस्टमार्फत रिझर्व्ह बँकेकडे परत केल्या पाहिजेत, पण अनेक बँकांकडून तसे होत नाही.
चौकट
नोटा परताव्याचे प्रमाण राष्ट्रीयीकृत बँकांकडून अधिक
रंग उडालेल्या, मळक्या किंवा फाटक्या नोटा परत पाठविण्याचे प्रमाण जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून जास्त होते. खासगी बँका व वित्तीय संस्थांकडून हे प्रमाण कमी आहे. काही खासगी बँकांशी चर्चा केल्यानंतर परत केलेल्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा येण्यास विलंब लागतो. तेेवढ्या कालावधीतील रोकडचे व त्यावरील व्याजाचे नुकसान बँकांना सोसावे लागते. त्यामुळे या प्रक्रियेचे पालन करणे शक्य होत नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने जलदगतीने परतावा केल्यास बाजारात पुन्हा चलनात येणाऱ्या जुनाट व रंग उडालेल्या नोटांचे प्रमाण कमी होईल.
कोट
रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार नागरिकांना किंवा व्यवहारात चांगल्या दर्जाच्या नोटा वापरात यायला हव्या. क्लिन नोट पॉलिसी तेच सांगते. तरीही काही बँकांकडून अशा नोटा पुन्हा चलनात आणल्या जातात. त्यामुळे बँकांनी याबाबत खबरदारी घ्यावी.
- लक्ष्मीकांत कट्टी, अध्यक्ष, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स, सांगली