मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील आंब्याची मळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतात शेजाऱ्याने उसाचे पाचट पेटवताना शामराव पांडुरंग पाटील यांच्या जनावरांच्या शेडला आग लागून दोन गाई जागीच मृत्युमुखी पडल्या, तर चार जनावरे गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. याप्रकरणी शामराव पाटील यांनी आनंदराव पाटील यांच्याविरोधात शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
आंब्याची मळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतात शामराव पांडुरंग पाटील यांचे जनावरांचे शेड आहे. मंगळवारी दुपारी दोनच्यासुमारास शेडच्या शेजारी आनंदराव सदाशिव पाटील यांनी उसाची पाचट पेटवली. त्यावेळी आग भडकून शेजारी असणाऱ्या जनावरांच्या शेडला आग लागली. यावेळी आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो अयशस्वी ठरला. दरम्यान, या आगीत शेडमधील दोन दुभत्या गाई जागीच मृत्युमुखी पडल्या, तर इतर चार जनावरे गंभीर जखमी झाली. आगीत शेडसह ऊस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री शिराळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हवालदार आनंदा मटकरी अधिक तपास करीत आहेत.