पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत माळी मळ्यात सात ते आठ एकर क्षेत्रातील ऊस शाॅर्टसर्किटने आग लागून जळाला. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
पेठनाकानजीक पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत रिलायन्स पेट्रोलपंपासमोर असलेल्या माळी मळ्यात नारायण विष्णू माळी, अनसूया रामचंद्र माळी, माणकू तुकाराम माळी, प्रकाश आकाराम माळी, सुदाम गंगाराम माळी, रवींद्र कुमार माळी, बजरंग कदम, जन्ननाथ पाटील यांची उसाची शेती आहे. या ठिकाणाहून विद्युतपुरवठ्याची वाहिनी गेली आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता शाॅर्टसर्किट होऊन उसाच्या फडाला आग लागली. यावेळी शेतकऱ्यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखाना व इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली. दोन्ही पथकांनी घटनास्थळी येत आग आटोक्यात आणली. तलाठी राहुल काळे यांनी पंचनामा केला आहे.