आटपाडी : आटपाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या ई-पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत शेतातील पीक पेराची नोंद स्वतः करता येणार आहे. याबाबत तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून माहिती घ्यावी, असे आवाहन आटपाडीच्या नूतन तहसीलदार बाई माने यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणीमध्ये ‘माझी शेती, माझा सात-बारा, मीच लिहिणार माझा पीक पेरा’ या उद्घोषणेनुसार काम सुरू असून, शेतकरी बांधवांना सध्या आपल्या मोबाईलमधून स्वतःचा पीक पेरा नोंद करता येणार आहे.
शेतकऱ्यांना गावपातळीवर पीकपेरा कशा पध्दतीने नोंद करायचा, यासाठी तहसीलदार बाई माने, नायब तहसीलदार विजय ढेरे, तलाठी ग्रामसेवक भेटी देत आहेत.
प्रत्येक गावातील सरपंच गावातील शेतकरी यांच्याशी भेटी देत पीक पेरा नोंद करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. संगणकीकृत ई-पीक पाहणीमध्ये पारदर्शकता असणार आहे. १५ सप्टेंबरअखेर पीक पाहणी नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार बाई माने व नायब तहसीलदार विजय ढेरे यांनी केले आहे.