खानापूर : टेंभू योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनसाठी खानापूर परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातून काढलेली चर बुजवली नसल्याने शेतीला मोठा फटका बसला आहे. चरीमुळे यंदा अनेक शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी करणे मुश्किलीचे बनले आहे.
मागील सहा महिन्यांपूर्वी खानापूर परिसराच्या दक्षिण बाजूस शेडगेवाडी, मोही, तासगाव रस्त्याच्या लगत टेंभू योजनेच्या कामासाठी पूर्व-पश्चिम अशी मोठी चर काढली आहे. संबंधितांनी काम लवकर संपणार आहे, असे सांगितल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकातून चर काढण्यास परवानगी दिली. यानंतर मोठ्या खोलीची चर खोदण्यात आली. पाइपलाइनचा पाइपही सदर ठिकाणी दाखल झाला. मात्र, यानंतर काम ठप्प झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही कामास टाळाटाळ होत आहे.
सध्या सर्वत्र खरिपाची पेरणी सुरू आहे. मात्र, चर काढलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पेरणीस मुकण्याची वेळ आली आहे, तरी संबंधितांनी त्वरित पाइपलाइनचे काम करून शेती पूर्ववत करून द्यावी, नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.