लाेकमत न्युज नेटवर्क
मिरज : रेल्वे अर्थसंकल्पात या वर्षी पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासोबत कऱ्हाड-चिपळूण, कोल्हापूर-वैभववाडी या नवीन रेल्वेमार्गासाठी भरीव तरतुदीची प्रवाशांची अपेक्षा आहे.
मिरज-पुणे दुहेरीकरणाचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू आहे. प्रस्तावित लोणंद-बारामती, कऱ्हाड-चिपळूण, फलटण-पंढरपूर व हातकणंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वेमार्गांचे सर्वेक्षण व तांत्रिक बाबी पूर्ण होऊन काम सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे. कोल्हापूर-वैभववाडी, कऱ्हाड-चिपळूण या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम सुरू होण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद होणे आवश्यक आहे. कोल्हापूर-मिरज विद्युतीकरण पूर्ण होऊन या मार्गाची चाचणीही झाली आहे. मिरज-पंढरपूर मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने रेल्वेगाड्यांची गती वाढणार आहे. कोरोनाच्या साथीमुळे गेल्या नऊ महिन्यांत मिरज व कोल्हापुरातून धावणाऱ्या पॅसेंजर व एक्स्प्रेस अद्याप बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. राज्य शासनाने पॅसेंजर सुरू करण्यास परवानगी देण्याची प्रवाशांची मागणी आहे. मिरज व कोल्हापूर स्थानकांतून कोल्हापूर-धनबाद व कोल्हापूर-अहमदाबाद या दोन एक्स्प्रेस वगळता गेल्या १० वर्षांत एकही नवीन लांब पल्ल्याची रेल्वेगाडी सुरू झालेली नाही. मिरज-पंढरपूर मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या अतिशय कमी आहे. या मार्गावरील कोल्हापूर-हैदराबाद रेल्वे बंद करण्यात आली आहे. सोलापूरला जाण्यासाठी सध्या एकही एक्स्प्रेस उपलब्ध नाही. विद्युतीकरण पूर्ण झाल्याने या मार्गावर रेल्वेगाड्या वाढविण्याची मागणी आहे.
कोल्हापूर-वैभववाडी, कऱ्हाड-चिपळूणसह सर्वेक्षण पूर्ण झालेल्या नवीन रेल्वेमार्गाची कामे निधीअभावी सुरू झालेली नाहीत. कोल्हापूर मॉडेल रेल्वेस्थानके बनविण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात पाच वर्षांपूर्वी घोषणा झाली. मात्र त्यासाठी निधीची तरतूद होत नसल्याने हे काम रखडले आहे. कोल्हापूर व मिरज या ‘अ’ दर्जाच्या रेल्वेस्थानकात वायफाय, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर, सरकता जिना अशा सुविधांची प्रतीक्षा आहे. या वर्षी रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेच्या पुणे विभागातील कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील प्रवाशांच्या मागण्यांची दखल घेऊन प्रवासी सुविधांसाठी निधीच्या तरतुदीची मागणी आहे.
सांगली, मिरज स्थानकांत पिटलाईनची व्यवस्था झाल्यास लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस मिरजेतून सुरू करता येणार आहेत. मिरज, सांगली, सातारा, कोल्हापूर रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण करून प्रवासी सुविधा, पॅसेंजर गाड्यांचे डबे वाढवावेत. मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाचे रखडलेले काम सुरू करण्याची व रेल्वे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम गतीने पूर्ण करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
दुहेरीकरणाची संथगती
मिरज-पुणे या २८० किलोमीटर रेल्वेमार्गांच्या दुहेरीकरणाच्या गेल्या तीन दशकांच्या मागणीस रेल्वेने मंजुरी दिल्यानंतर २०१७ मध्ये दुहेरी करणाच्या कामास प्रारंभ झाला. मात्र गेल्या चार वर्षांत पुण्याजवळ काही किलोमीटर व ताकारी ते शेणोली ४५ किलोमीटर दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी मार्गाच्या मातीच्या भराव व पुलांचे काम अद्याप सुरु आहे. काम संथगतीने सुरू असल्याने या वर्षी जुलै २०२१ पर्यंत निर्धारित वेळेत दुहेरीकरण पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याने प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मिरज-पुणेसोबत सुरू झालेल्या दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या मिरज -लोंढा दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. मिरज-पुणे दुहेरीकरण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वेगाड्यांची संख्या व गती वाढणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. मात्र काम वेळेत पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.