आटपाडी : तालुक्यातील सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे विविध संघटना वारंवार आंदोलने करीत होत्या. आटपाडी पोलिसांनी दक्षतेचा उपाय म्हणून २०१३ पासून प्रवेशद्वारच कायमस्वरूपी बंद केले होते. आता तब्बल सात वर्षांनी हे प्रवेशद्वार उघडण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांची ठाण्यात इतर प्रवेशद्वारांतून चोरासारखे जाण्याची नामुष्की टळली आहे.
शासकीय इमारत होण्यापूर्वी पोलीस ठाण्याच्या शेजारी तहसील कार्यालय होते. त्यामुळे तहसील कार्यालयावर मोर्चे काढले जायचे. टेंभू योजनेसाठी खूप आंदोलने झाली. चारा छावण्यांसाठी जनावरे आवारात सोडण्यात आली. मेंढ्या घुसविण्यापासून कुलपे ठोकण्यापर्यंत आंदोलने झाली. मग पोलिसांनी आंदोलकांना बाहेरच रोखण्यासाठी प्रवेशद्वारच बंद केले होते.
आता नव्याने तहसील कार्यालय झाले. त्यांच्या प्रवेशद्वारातून पोलीस येऊ लागले; पण वाळूतस्करी करताना पकडलेली वाहने पुन्हा चोरून नेऊ नयेत यासाठी ते प्रवेशद्वाराला कुलूप लावू लागले. त्यामुळे पोलिसांची पंचाईत झाली. त्यासाठी त्यांनी प्रवेशद्वार उघडले. चांगली स्वच्छताही केली आहे. अंगणात फरशी टाकण्याचे नियोजन आहे.
कोट
चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी लवकरच एका अधिकाऱ्यासह विशेष पथकाची नेमणूक करणार आहे. हे पथक फक्त घरफोड्यांचाच तपास करील.
- अरुण देवकर पोलीस निरीक्षक, आटपाडी
चौकटीत
खोटे गुन्हे कधी थांबणार?
आटपाडी पोलीस ठाणे खोट्या गुन्ह्यांसाठी प्रसिद्ध आहे. परस्परविरोधी फिर्याद देताना ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्यावरही गुन्हे दाखल झाल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अगदी विनयभंगाचेही खोटे गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे पोलिसांची विश्वासार्हता कमी होऊ लागली आहे. हे पोलिसांच्या आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने धोक्याचे आहे.
चौकट
गुन्हे वाढले, पोलीस घटले!
आटपाडी तालुक्यात गुन्ह्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. २०१९ मध्ये २८७, तर २०२० मध्ये ३१९ दखलपात्र गुन्हे दाखल झाले. २०१९ मध्ये १३ विनयभंग व २०२० मध्ये ४० गुन्हे दाखल आहेत. गुन्हे वाढत असताना पोलिसांची संख्या मात्र कमी केली जात आहे. १ लाख ३५ हजार लोकसंख्येच्या आणि ६० गावांच्या या तालुक्यात केवळ ४० पोलीस आहेत. इथे किमान १०० पोलिसांची गरज आहे.
फोटो-११आटपाडी१