जत : तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्ष्यवेधी होत आहेत. त्यापैकी सहा ग्रामपंचायतीत दुरंगी, तर एका गावात तिरंगी लढत होत आहे.
डोर्ली, गुड्डापूर, शेगाव, सिंगनहळ्ळी, उटगी, वळसंग या सहा ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी, तर उमराणीमध्ये तिरंगी लढत होत आहे. या सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जत तालुक्यात लक्ष्यवेधी ठरत आहेत. आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि प्रमुख राजकीय नेत्यांचा सहभाग असल्यामुळे लढती लक्ष्यवेधी ठरत आहेत. उमराणीमध्ये शेतकरी संघटनेचे दुंडाप्पा बिरजदार, भाजपचे आप्पासाहेब नामद, काँग्रेसचे मल्लेश कत्ती यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले असून, त्यांच्यात तिरंगी लढत होत आहे. येथे राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पॅनल तयार केले आहे. डोर्ली ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुकेश पवार व भाजपचे पिंटू माने यांनी एकत्र येऊन पॅनल तयार केले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे पॅनल आहे, त्यामुळे तेथे दुरंगी लढत होत आहे. वळसंग येथे सर्वच स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्ष बाजूला ठेवून स्थानिक आघाडी तयार करून पॅनल तयार केले आहे. त्यामुळे गावातील दोन पॅनलमध्ये सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. येथे भाजपविरुद्ध काँग्रेस असा दुरंगी सामना आहे.
जेवणावळी, बॅनर-पोस्टर छपाई व त्याचे वाटप आणि कार्यकर्त्यांच्या भेटीभेटी घेऊन मतदारांचे मन वळवण्यासाठी पॅनल प्रमुख व स्थानिक नेतेमंडळी सक्रिय झाली आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे.
तालुका पातळीवरील नेत्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन निवडणूक प्रचारात सहभाग न घेता जो निवडून येईल तो आपलाच आहे, अशी भूमिका घेऊन सबुरीने प्रचार करण्याचा सल्ला सर्वांना दिला आहे.