अशोक पाटील- इस्लामपूरनगरपरिषदेच्या गुरुवार, दि. १३ आॅगस्टरोजी झालेल्या विशेष सभेच्या विषयपत्रिकेवर इस्लामपूरचे नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांची स्वाक्षरी पालिकेतील कर्मचाऱ्याने केल्याचे निदर्शनास आले. यावर विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी आक्षेप नोंदवला. सूर्यवंशी केवळ स्वाक्षरी करण्यापुरतेच नगराध्यक्ष असल्याची चर्चा होती, मात्र आता तोही अधिकार त्यांनी गमावल्याचे या प्रकारावरून दिसत आहे.अनेक मंत्री, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कामातून वेळ मिळत नसल्याने ते स्वत:च्या गैरहजेरीत मर्जीतील व्यक्तीला महत्त्वाची कागदपत्रे वगळता शिफारस पत्र, बैठकीचे निमंत्रण आदी पत्रांवर स्वाक्षरीचे अधिकार देतात. तसाच काहीसा प्रकार येथे घडला. नगराध्यक्ष सूर्यवंशी काही कामानिमित्त परगावी गेले होते. त्यातच नूतन मुख्याधिकारी दीपक झिंजाड कामावर रुजू झाले. नगराध्यक्षांच्या गैरहजेरीत गुरुवार, दि. १३ आॅगस्टरोजी सभेची विषयपत्रिका काढण्यात आली. त्याचे एकमेव कारण म्हणजे १३ तारखेच्या सभेचा ठराव नगरविकास खात्याकडे तातडीने पाठवायचा होता. परंतु नगराध्यक्ष नसल्याने विषयपत्रिकेवर स्वाक्षरी कोण करणार, असा प्रश्न होता. यावर तोडगा म्हणून पालिकेतील एका कर्मचाऱ्याने त्यांची हुबेहूब स्वाक्षरी केली. यावर विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी त्याच सभेत आक्षेप नोंदवला, परंतु त्यांची सत्ताधाऱ्यांनी दखलच घेतली नाही.इस्लामपूर नगरपालिकेवर एम. डी. पवार यांची २५ वर्षे सत्ता होती. शहरातील कोणताही निर्णय त्यांच्या आदेशाशिवाय होत नसे. मात्र ते नगराध्यक्ष असताना पालिकेतील नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत कधीही बसले नाहीत. नगरपालिकेतील सर्व कागदपत्रे स्वाक्षरीसाठी बाजार समितीच्या आवारातील त्यांच्या आॅईल मीलमध्ये जात असत. नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर त्यांचा तेवढा वचक होता. कालांतराने पवार यांची सत्ता गेली. त्यानंतर उरुण परिसरातील पाटील पार्टीची सत्ता पालिकेत आली. पाटील पार्टीतील अनेक नेत्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिला. नगराध्यक्ष पदावर जे अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी आले, त्यांचा केवळ ‘सह्याजीराव’ म्हणून वापर केला गेला.पाटील पार्टीच्या कार्यकाळात आतापर्यंत शिवाप्पा सांभारे, अॅड. सुधीर पिसे, शकुंतला माळी, मुनीर पटवेकर आणि त्यानंतर सुभाष सूर्यवंशी हे अल्पसंख्याक समाजाचे नगराध्यक्ष झाले आहेत. हे केवळ सहीपुरतेच खुर्चीचे धनी आहेत. मात्र सुभाष सूर्यवंशी यांनी तर सहीचा अधिकारही दुसऱ्याला देऊन टाकला आहे. या प्रकाराची चर्चा शहरात सुरू आहे.दि. १३ रोजीच्या विशेष सभेच्या विषयपत्रिकेवर नगराध्यक्ष सूर्यवंशी यांची स्वाक्षरी बोगस असल्याचा प्रश्न उपस्थित केला. परंतु मुख्याधिकारी झिंजाड यांनी हा प्रशासनाचा प्रश्न येत नाही, असे उत्तर देऊन त्यावर पांघरुण घातले. नगराध्यक्षांनी मात्र हे मान्य केले नाही. या बोगस स्वाक्षरीची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. रस्ता विकास निधीतील २३ कोटी ५७ लाख रुपये रस्त्यावर खर्च करावेत व भुयारी गटारीचा नवीन प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे द्यावा, अशी उपसूचना सभागृहात केली आहे. हा ठराव बदलला जाण्याची शक्यता आहे.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते.विषयपत्रिकेच्या कायदेशीरपणाचा प्रश्नइस्लामपूर पालिकेची विशेष सभा १३ आॅगस्टरोजी अत्यंत घाईगडबडीत झाली. सभेवेळी सभागृहात प्रसारमाध्यमांना वितरित करण्यात आलेल्या विषयपत्रिकेवर नगराध्यक्ष सूर्यवंशी यांची स्वाक्षरी नव्हती. नगराध्यक्षांची स्वाक्षरी नसणारी सभेची नोटीस किंवा विषयपत्रिका कायदेशीर ठरते का, असा नवाच पेच उभा राहिला आहे. मात्र नगरसेवकांना देण्यात आलेल्या पत्रिकेवर नगराध्यक्षांची बोगस स्वाक्षरी असल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे.
इस्लामपुरात नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी डमी!
By admin | Updated: August 20, 2015 22:56 IST