धैर्यशील माने, राजू शेट्टी
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर, शिराळा हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीचे बालेकिल्ले मानले जातात. या बालेकिल्ल्यात पालकमंत्री जयंत पाटील जे आदेश देतील तोच पाळला जातो. त्यामुळे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने स्वबळावर या दोन्ही मतदारसंघात दमदार एन्ट्रीने जनतेशी संपर्क साधत आहेत. तर माजी खासदार राजू शेट्टी यांना सदाभाऊ खोत यांचा अडसर आहे. शेट्टी यांनी आता राष्ट्रवादीचा नाद सोडून छोट्या-मोठ्या संघटना हाताशी धरत या दोन्ही मतदारसंघात राजकीय कसरत करत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. वाळवा, शिराळ्यात रुग्णांची संख्या पाहता आरोग्याची सुविधा अपुरी पडत आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी मतदारसंघात तळ ठोकला आहे, परंतु वाढत्या कोरोनाला थोपविण्यासाठी मंत्री पाटील यांनी आढावा बैठकीवरच जोर ठेवला आहे, परंतु बैठकीत होणाऱ्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. इस्लामपूर शहर परिसरात कोरोना रुग्ण आणि मृत्यू दर वाढतच आहे. तर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे स्वतंत्र आढावा बैठक घेऊन सूचना देतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आष्टा येथे आढावा बैठक घेऊन मदतीचे साहाय्य केले आहे. डॉक्टरांची बैठक घेऊन काही सूचना दिल्या आहेत. या पलीकडे या दोन तालुक्यात खा. माने यांनी ठोस काहीही केले नसल्याची चर्चा आहे.
दोन मतदारसंघ शेतकरी नेत्यांचे होम पिचच मानले जाते. माजी खासदार राजू शेट्टी यांची पक्षपातळीवर ठोस भूमिका नाही. त्यामुळे राष्ट्रवादीपासून दुरावले आहेत. पहिल्या लाटेत इस्लामपूर पालिकेला फवारणीचे औषध पुरविले होते. दुसऱ्या लाटेत मात्र आता छोट्या-मोठ्या संघटना घेऊन निवेदने देण्यापलीकडे काहीच करत नसल्याचे चित्र आहे. लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना आपला माल चोरून मातीमोल किमतीने विकावा लागत आहे. याचे भानही आता शेतकरी नेत्यांना राहिले नाही. तरीसुद्धा आजी-माजी खासदार या दोन्ही मतदारसंघात आपले स्थान पक्के करण्यासाठी या ना त्या कारणाने सक्रिय आहेत.