सांगली : वाळवा पंचायत समितीच्या नव्या सभागृहास वसंतराव नाईक यांचे नाव देण्याचा आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषदेला दिला आहे. आधीच या सभागृहास वसंतदादांचे नाव, की राजारामबापूंचे नाव द्यायचे, यावरून संघर्ष धुमसत आहे. त्यात आता या नामकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.वाळवा पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमधील सभागृहास वसंतदादा पाटील यांचे नाव होते. ही इमारत जुनी झाल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कालावधीत नवीन इमारतीसाठी दोन कोटींचा निधी मिळाला. इमारत पूर्ण होऊन दोन वर्षे झाली. तेथील नवीन सभागृहास वसंतदादांचेच देण्याची मागणी दादा समर्थकांनी केली होती. यावरून वाळवा पंचायत समितीच्या सभेसह जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये टोकाचा संघर्ष झाला होता. वाळवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असल्याने त्यांनी नवीन सभागृहास राजारामबापू पाटील यांचे नाव देण्याचा घाट घातला.मागीलवर्षी वाळवा पंचायत समितीने नवीन इमारतीमधील सभागृहास राजारामबापू यांचे नाव देण्याचा ठराव करून जिल्हा परिषदेकडे पाठविला होता. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे तेथेही हा ठराव मंजूर झाला. काँग्रेसचे सदस्य सम्राट महाडिक, रणधीर नाईक यांनी तीव्र विरोध करून, नवीन सभागृहास वसंतदादा पाटील यांचेच नाव देण्याची मागणी केली होती. दोन्हीकडील सदस्य सभेवर बहिष्कार घालून निघून गेले होते. विरोधकांचा विरोध न जुमानता बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादीने नव्या सभागृहास राजारामबापूंचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला होता. याविरोधात महाडिक, नाईक यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शासनाकडे तक्रार केली होती. याचवेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी वाळवा पंचायत समितीच्या नवीन सभागृहास क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली होती. अन्य काही सामाजिक संस्थांनीही, दादा-बापूंच्या नावावरून निर्माण झालेला वाद मिटविण्यासाठी क्रांतिसिंहांचे नाव देण्याची मागणी केली होती. याबाबत शासनाकडे दि. २३ नोव्हेंबर २०१५ रोजी एक तक्रार झाली होती. याची दखल घेऊन शासनाने वाळवा पंचायत समितीच्या नवीन सभागृहास वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे, असा लेखी आदेश दिला आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे सहसचिव नं. म. शिंदे यांनी हा आदेश काढला आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहासही वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे, असे आदेशही राज्य शासनाने दिल्यामुळे जि. प. पदाधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. (प्रतिनिधी)बापूंचेच नाव राहणार!वाळवा पंचायत समितीच्या नवीन सभागृहास राजारामबापू पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय सर्वांच्या सहमतीने झाला आहे. पंचायत समिती सभेत आणि जि. प. सभेत हा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. रितसर नियमानुसार सभागृहास राजारामबापू यांचे नाव दिले असताना, आता वसंतराव नाईक यांचे नाव देण्याचा शासनाने आदेश कसा दिला आहे, हेच कळत नाही. वाळवा पंचायत समितीला अद्याप हा आदेश मिळाला नाही. शासनाला आमची बाजू पटवून देण्यात येईल. सभागृहास राजारामबापू यांचेच नाव राहील, अशी प्रतिक्रिया वाळवा पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे यांनी दिली.नाईकांचे नाव देण्यास काँग्रेसचा पाठिंबाजुन्या सभागृहास वसंतदादा पाटील यांचे नाव होते, तेच नाव नवीन सभागृहाला ठेवण्याची आमची मागणी होती. या मागणीकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष करून बहुमताच्या जोरावर राजारामबापूंचे नाव दिले. यास आमचा विरोध होता. शासनाने आदेश काढून आता वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची सूचना दिली आहे. या आदेशाची प्रशासकीय यंत्रणेने अंमलबजावणी करावी, अशी आमची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद सुरेश मोहिते-पाटील व सम्राट महाडिक यांनी व्यक्त केली. आमचा नाईक यांच्या नावास विरोध नसल्याचेही त्यांनी सांगितले.प्रशासनाने कशासाठी पत्र दाबून ठेवले?वाळवा पंचायत समितीच्या नवीन सभागृहास वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे, अशा आदेशाचे पत्र महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे सहसचिव नं. म. शिंदे यांनी दि. ४ मेरोजी जिल्हा परिषदेला पाठविले आहे. ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला दि. १६ मेरोजी मिळाले असून, बांधकाम विभागाकडे २० मे रोजी मिळाले आहे. एवढे दिवस अधिकाऱ्यांनी हे पत्र का दाबून ठेवले?, असा प्रश्न सुरेश मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला. प्रशासनाने शासनाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
वाळवा पं. स. सभागृहास वसंतराव नाईकांचे नाव
By admin | Updated: May 28, 2016 00:51 IST