सांगली : राज्यातील जनतेने मोठ्या उमेदीने भाजपकडे सत्ता सोपविली, पण अपघाताने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने राज्यातील दुष्काळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या असंवेदनशील सरकारविरोधात लढ्याची सुरूवात सांगलीतून केली जाणार असून दुष्काळप्रश्नी मोर्चात राज्यभरातील नेते सहभागी होतील, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी केली. तासगाव तालुक्यात कोणाचीही दादागिरी सहन केली जाणार नाही, असा टोलाही त्यांनी खासदार संजयकाका पाटील यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात तटकरे बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. सुमनताई पाटील, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, पक्षनिरीक्षक राजलक्ष्मी भोसले, माजी आमदार मानसिंगराव नाईक, अरुण लाड उपस्थित होते. तटकरे म्हणाले की, राज्य व केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उकल करण्याची मानसिकता सरकारकडे नाही. राज्यात ५० टक्केपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रासारख्या संपन्न भागात दुष्काळी स्थिती गंभीर बनली आहे. ७२ पेक्षाही दुष्काळाची तीव्रता वाढणार आहे. त्यासाठी विधिमंडळात कर्जमाफीची मागणी केली होती. पण आम्ही पंधरा वर्षात काय केले, असे विचारत भाजपने या प्रश्नाकडे कानाडोळा केला. सरकार असंवेदनशील आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला रस्त्यावर उतरण्याची भूमिका घ्यावी लागेल. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जनतेला न्याय देण्यासाठी लवकरच मोर्चा काढला जाणार आहे. त्यात राज्यभरातील नेते सहभागी होतील. मुख्यमंत्र्यांवर टीका करीत ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. गेल्या आठ महिन्यात गुन्ह्यांचा आलेख वाढला आहे. आर. आर. पाटील आबांकडे गृहखाते असताना एक धाक होता. आज तो संपला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्यावर टीका करणाऱ्या मंत्री विनोद तावडे यांनी बोगस पदवीचा खुलासा जनतेला द्यावा. आम्हाला शहाणपण शिकविण्याची गरज नाही. केंद्रातील मोदी सरकार कान, डोळे, तोंड असूनही बहिरे, अंधळे, मुके बनले आहे. जयंत पाटील म्हणाले की, वीज बिलासाठी ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजना बंद ठेवल्या आहेत. सरकारविरोधात एकसंध संघर्ष करावा लागणार आहे. लवकरच चारा छावणी, टँकरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. स्वच्छ कारभाराची हमी देणारे भाजप सरकार घोटाळ्याचे नवे आदर्श निर्माण करीत आहे. शिक्षणमंत्र्यांकडे बोगस पदवी आहे. बारावी झालेल्या स्मृती इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकास खाते दिले आहे. पंतप्रधान संसदेत बोलल्याचे कधी दिसले नाही. दूरचित्रवाणीवर मात्र त्यांची भाषणे सुरू असतात. ते बघूनच पंतप्रधान अद्याप आहेत, असे समजून घ्यावे लागते, असा टोला लगावला. धनगर, मराठा व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या आश्वासनालाही हरताळ फासल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी स्वागत केले. संजय बजाज यांनी आभार मानले. यावेळी आ. निरंजन डावखरे, बाबासाहेब मुळीक, उषा दशवंत, सुरेखा लाड, वसुधा कुंभार, नामदेव करजणे, योजना शिंदे, लीलाताई जाधव यांची भाषणे झाली. मेळाव्याला जि. प. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, सागर घोडके, अभिजित हारगे, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, कमलाकर पाटील, योगेंद्र थोरात, मनोज भिसे, युसुफ मेस्त्री उपस्थित होते. (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रावर सूड : शिंदे आ. शशिकांत शिंदे यांनी भाजपवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्याच्या विकासाबाबत कोणाचे दुमत नाही. पण सध्याच्या भाजप सरकारचा पश्चिम महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. या भागावर अन्याय व सूड उगविला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे आमदार, खासदार काय करतात? वीज बिलासाठी सिंचन योजना बंद ठेवल्या जातात. त्या पूर्ण करणार आहेत की नाही, अशी शंका येते. आपल्याच मस्तीत असलेल्या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. सुमनतार्इंच्या पाठीशी राष्ट्रवादी! तटकरे म्हणाले की, आर. आर. आबांच्या निधनानंतर तासगाव तालुक्यात वेगळे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाजार समिती निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली गेली. तासगावातील दादागिरी यापुढे सहन केली जाणार नाही. आ. सुमनतार्इंच्या पाठीशी केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यपातळीवरील नेतेही खंबीरपणे उभे आहेत. आर. आर. आबांची उणीव आर. आर. आबांच्या निधनानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिलाच जाहीर कार्यक्रम झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे, आ. शशिकांत शिंदे यांनी आबांची उणीव जाणवत असल्याचे स्पष्ट केले. भाजप सरकारने चिक्कीपासून बोगस पदवीपर्यंत अनेक घोटाळे केले. आता आबा विधिमंडळात असते, तर भाजप सरकारला सांगलीचे पाणी दाखवून दिले असते, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.
दुष्काळप्रश्नी सांगलीतून लढा उभारणार
By admin | Updated: August 22, 2015 00:48 IST