प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष उत्पादकांनी बागा वाचविल्या आहेत. यंदा द्राक्ष निर्यातीसाठी जिल्ह्यातील २६५० शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली, तर १९९४ शेतकऱ्यांनी नूतनीकरण केले आहे. ४६४४ शेतकऱ्यांनी एकूण नोंदणी झाली. २२५६ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष निर्यात होणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा तब्बल एक हजार हेक्टरने वाढ झाली. नोंदणी झालेल्या क्षेत्रापैकी ६० टक्के द्राक्षांची निर्यात झाली आहेत, अशी माहिती कृषी अधिकारी प्रकाश नागरगोजे यांनी दिली.
युरोपमधील फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लिथुएनिया, नेदरलँड, स्पेन, आदी देशांमध्ये ३५७ कंटनेरमधून ४६८९ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. तेथून ९९ टक्के मागणी थॉमसन सिडलेस द्राक्षांना आहे. जानेवारी, फेब्रुवारीत निर्यात झालेल्या द्राक्षांना किलोला १०० ते ११० रुपये दर मिळाला होता. सध्याही युरोपमधून मागणी कायम असून, दरही चांगला आहे. केंद्र शासनाकडून निर्यातदारांना द्राक्ष निर्यातीवर कंटेनरला एक लाखाचे अनुदान होते. ते बंद केल्यामुळे निर्यातीचा खर्च वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत आहेत.
चौकट
युरोपबरोबरच कॅनडा २६ कंटेनर, चीन ७७, कतार १२, रशिया २७, सिंगापूर २, सौदी अरेबिया १११, थायलंड ३, मलेशिया ६, हाँगकाँग ८, ओमान ३५, संयुक्त अरब अमिराती ४०, आदी देशांमध्ये ३५८ कंटेनरमधून ५०३४ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. तेथेही १०० ते ५० रुपये दर आहे. सोनाक्का, सुपर सोनाक्का, शरद सिडलेस वाणाला जादा मागणी आहे.