सांगली : सांगली शहरात राजवाडा परिसरात बिबट्या आला. कोल्हापुरातून मागवलेल्या ट्रँक्विलायझर बंदुकीचा वापर करत बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले. या निमित्ताने डिजिटल फॉरेस्ट गव्हर्नन्स केवळ कागदावरच असल्याची बाब समोर आली आहे, असे मत रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आपत्ती व्यवस्थापन, आवश्यक जाळे, पिंजरा, अभ्यासू वनरक्षक व अधिकारी, वन व्यवस्थापनासाठी माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाचा व अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा अभाव असल्याचे सांगलीतील बिबट्याच्या घटनेतून दिसून आले. यासोबत जवळील वनक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, कॅमेरा ट्रॅप आणि क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेरे, जीपीएस टेक्नोलॉजी, ट्रॅकिंग प्रणाली अशा उपकरणांचा पुरेपूर वापर होत नसल्याचे दिसून आले. आता पग मार्क्सव्यतिरिक्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बिबटे, वाघ यांचा शोध घेऊन रेडिओ कॉलर माईक अशी उपकरणे वापरणे गरजेचे आहे.