सांगली : आशा कार्यकर्त्या व गटप्रवर्तक १५ जूनपासून बेमुदत संपावर आहेत. त्यांच्या मागण्यांविषयी शासनाने समाधानकारक तोडगा न काढल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय लाल बावटा संघटनेने घेतला आहे. त्यानुसार सोमवारी (दि. २१) सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
सरकारने कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांकडून जोखमीची कामे करून घेतली. मात्र, त्याचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणाचे कामही अतिरिक्त मोबदला न देताच करून घेण्यात आले. आता रॅपिड अँटिजन चाचण्याही घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारीही आशांवर टाकण्यात येत आहे. कोविड काळात जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या राज्यभरातील आशा व गट प्रवर्तकांवर होणारा अन्याय सहन करणे अशक्य असल्याने सिटू व समविचारी कामगार संघटनांनी बेमुदत संप सुरू केला आहे. कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला मिळावा, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्यावा, आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्ती द्यावी, नियमित वेतनात भरीव वाढ करावी अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.
यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली. पण त्यातून मार्ग निघाला नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. सांगलीतील निदर्शनात जिल्हाभरातून आशा व गट प्रवर्तक सहभागी होणार असल्याची माहिती आंदोलनाचे संयोजक उमेश देशमुख यांनी दिली. नेतृत्व मीना कोळी, वर्षा ढोबळे, सुरेखा जाधव, हणमंत कोळी, विमल जाधव, अंजू नदाफ, शबाना आगा, लता जाधव आदींनी केले आहे.