अमोल कुदळे
दूधगाव : मिरज तालुक्यातील दूधगाव येथे साठ वर्षांपूर्वीचा वारणा नदीवरील बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले असून याचा एका युवकाचा मृत्यू झाला आहे.
उन्हाळ्याची सुट्टी असल्याने वारणा नदीवर पोहण्यासाठी दूधगाव, सावळवाडी, माळवाडी येथील युवकांची गर्दी होत असते. मंगळवार दि. ६ रोजी सावळवाडी येथील सोहेल शेख हा युवक आपल्या मित्रांसमवेत पोहण्यासाठी आला होता. सोहेल शेख यांनी हातात कॅन धरून बंधाऱ्यावरून उडी मारली. यावेळी हातातील केन निसटून सोहेल बंधाऱ्याच्या निखळलेल्या दगडामध्ये जाऊन अडकला.
यामध्ये सोहेलचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह काढण्यासाठी तीन दिवस आपत्कालीन पथक प्रयत्न करत होतो; पण बंधाऱ्याच्या दगडांमध्ये अडकलेला मृतदेह काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली.
पाटबंधारे विभागाला वारंवार सूचना व लेखी निवेदन देऊन देखील बंधाऱ्याच्या दुरवस्थाकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी येऊन पाहणी करून गेले होते. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी सूर उमटत आहे.
चौकाट
केवळ पाहणी
या बंधाऱ्याच्या दुरवस्थेबाबत दि. २७ मार्च रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. या बातमीची दाखल घेऊन अधिकाऱ्यांनी पाहणी करून गेले; पण अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.