मांजर्डे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आपला भाजीपाला गावातच फिरून विकावा लागत आहे. तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पाहता सर्वत्रच कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील भाजीपाला उत्पादक शेतकरी आपला माल स्थानिक व्यापाऱ्यांना देत आहेत.
काही शेतकरी आणि व्यापारी आपला भाजीपाला, फळे गाडीवरून, छोटा हत्ती यासारख्या वाहनातून फिरून विकत आहेत. तासगाव तालुक्यातील गावांना आरफळ आणि ताकारी योजनेच्या पाण्यामुळे बागायती शेतीमध्ये भाजीपाला व फळे यांचे उत्पादन वाढवले असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना आपली द्राक्षे, भाजीपाला कमी दराने विक्री करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत आहे.