लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहर व परिसरातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यासह खासगी डॉक्टरांनी हातात हात घालून काम करावे. नागरिकांनी प्रशासनाला कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मदत करावी, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
आष्टा येथे आष्टा, वाळवा, बावची, बागणी येथील गावांतील कोरोना आढावा बैठकीत खासदार माने बोलत होते. यावेळी अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे, विशाल शिंदे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, आदी उपस्थित उपस्थित होते. धैर्यशील माने पुढे म्हणाले, सध्या ऑक्सिजन बेड मिळणे मुश्कील झाले आहे. ऑक्सिजनची कमतरता आहे. यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे.
भाजीपाला विक्रीसाठी विक्रेत्यांना एका ठिकाणी न बसविता गाड्यावरून विक्री करण्याची गरज आहे. युवक मंडळे, सामाजिक संस्था, ग्राम समित्या यांनाही सहभागी करून घेऊन कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावेत. किराणा, धान्य व्यापारी व भाजीपाला विक्रेते यांची अँटिजेन टेस्ट करण्यात यावी.
वैभव शिंदे म्हणाले, आष्टा शहरातील सर्व प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याची गरज आहे. शहरात पंधरा ते वीस ऑक्सिजन किट देण्याची मागणी केली.
वीर कुदळे म्हणाले, आष्टा पालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह असूनही शहरातील नागरिकांची काळजी घेत आहेत.
पोलीस निरीक्षक अजित सिद म्हणाले, आष्टा पोलीस ठाणे या ठिकाणी ३५ कर्मचारी असून, २८ होमगार्ड यांच्या सहकार्याने शहर व परिसरात नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.
डॉ. संतोष निगडी म्हणाले, आष्टा शहरात १८८, वाळवा १९३, बावची १५६, बागणी १२३ असे एकूण ६६० कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आष्टा येथे पाच हजार ८०३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
यावेळी नंदकिशोर आटुगडे, सतीश माळी, अनिल बोंडे, पुष्पलता माळी, तेजश्री बोंडे, डॉ. सतीश बापट, जगन्नाथ बसुगडे, बाबासाहेब सिद्ध, संजय सनदी, शेरनवाब देवळे, अर्चना माळी ,वर्षा अवघडे, आदी उपस्थित होते.
चौकट
ग्रामीण रुग्णालयाच्या आशा वर्कर काम करीत नाहीत. प्रशासनाला उपलब्ध कर्मचाऱ्यावर काम करावे लागत आहे. मात्र, इस्लामपूर ग्रामीण रुग्णालयात आशा वर्कर आहेत, तर आष्टा ग्रामीण रुग्णालयाला आशा वर्कर नसल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लवकरच कर्मचारी वाढवून देण्याची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली. डॉक्टरांचीही रिक्त पदे भरण्याची गरज आहे.