सुमारे दीड वर्षाहून अधिक काळ आपण कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देत आहोत. या काळात कोरोना संक्रमणाने अनेक आप्त, स्वकीय, मित्रमंडळी आपण गमावली आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देत कित्येक रुग्णांना या संक्रमणातून यशस्वी बाहेर पडण्यासाठी मानसिंगभाऊंनी प्रयत्न केले आहेत. मतदार संघातील जनतेसाठी नियोजनपूर्वक व ठोस वाटचाल केली आहे. आमदार भाऊंनी निर्माण केलेल्या यंत्रणेकडून हजारो लोकांना मदत झाली आहे. मतदार संघातील जनतेच्या आरोग्यहिताला प्राधान्य दिले आहे.
आमदार मानसिंगभाऊंनी समाजमन ओळखून त्यांच्या अडी-अडचणी, प्रश्न व गरजा जाणून त्या सोडविण्यासाठी बांधिल आहेत. स्पष्टवक्तेपणा, निवडणुकीपुरते राजकारण व इतरवेळी समाजकारण करणारे ‘मानसिंगभाऊ’ सर्वांना परिचित आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सहकार, शेती, शेतकरी यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी झटणारे नेतृत्व, अशी ओळख त्यांनी त्यांच्या कामातून निर्माण केली आहे. प्रसंग, परिस्थिती कोणताही असो, लढायचेच ही त्यांच्या कामाची खास बाब आहे.
कोविड योध्दा लोकप्रतिनिधी :
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढू लागताच हे नेमके काय संकट आहे, याची माहिती देण्यासाठी त्यांनी संपूर्ण मतदार संघाचा दौरा केला. कोरोना रोखण्याबाबत उपाययोजना, त्यांनी घेतलेल्या खबरदार्या, गावाचे नियोजन, ग्रामपंचायत, नगर पंचायतीची कर्तव्य, त्यांच्या जबाबदार्या आदींबाबत माहितीची देवाणघेवाण या दौर्यातून केली. यामुळे डोंगरावर वसलेल्या वाड्या- वस्त्यांपर्यंत कोरोना विषाणूची माहिती पोहोचली. विराज इंडस्ट्रिजमध्ये सॅनिटायझरची निर्मिती केली. प्रत्येक ग्रामपंचायतीला ना नफा, ना तोटा या तत्वावर सॅनिटायझरचा पुरवठा केला जात आहे.
योग्य नियोजन करत दिला मदतीचा हात :
महसूल, पोलीस, आरोग्य, पंचायत समिती आदी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन योग्यप्रकारे नियोजन केले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तेथे कोणकोणत्या उणिवा आहेत, कशाची आवश्यकता आहे, हे समजावून घेऊन त्या सोडवल्या. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आदींना मास्क व फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. संस्थात्मक विलगीकरणातील लोकांना चादर व बेडशिटचे वाटप, नगर पंचायत क्षेत्रातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, अर्धवेळ परिचारिका, आदींना शासनाने दिलेला प्रत्येकी एक हजार रुपयांचा प्राेत्साहन भत्ता मिळत नाही, म्हटल्यावर त्यांनी लोकनेते फत्तेसिंगराव नाईक ट्रस्टमार्फत तो देण्याची व्यवस्था केली. शिराळा तालुका ग्रामीण आहे. विशेषतः पश्चिम भागातील नागरिकांची आरोग्याची सोय व्हावी, यासाठी कोकरूड ग्रामीण रूग्णालयात विलगीकरण कक्ष उभारला. शिराळा तालुक्यातील सर्व शाळांना सॅनिटायझर मशीनचे मोफत वाटप केले.
शासकीय मदत आणि प्रसंगी पदरमोड :
शिराळा उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केले. त्याच्यासाठी लागणारी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध केली. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून सहा टन क्षमतेच्या ऑक्सिजन टाकीची उभारणी केली. कोकरूड ग्रामीण रुग्णालयाला जंम्बो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले. शिराळा उपजिल्हा रुग्णालयासाठी २५ ऑक्सिजन बेडसाठीचे सर्व साहित्य पदरमोड करून उपलब्ध करून दिले.
कोविड रुग्णांसाठी सतत धडपड :
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव, त्याची दाहकता, वाढता प्रसार या गोष्टी लक्षात येऊनही कित्येकदा अनेक लोकांनी सांगूनही त्यांनी जनतेचा संपर्क तुटू दिला नाही. जनतेसाठी स्वत:चे आरोग्य धोक्यात घातले. ऑक्सिजन बेडची, व्हेंटिलेटर बेडची, रेमडेसिविर व तत्सम इंजेक्शनची उपलब्धता करुन देणे, आदी कामासाठी फोन केलेल्या कोणालाही नाराज होऊ दिले नाही.
औद्योगिकरणाचा चेहरा दिला :
औद्योगिकरणात ‘विश्वास’ व ‘विराज’ उद्योग समूहाने सांगली जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गरुडभरारी घेऊन अनेक मानांकने प्राप्त केली आहेत. त्यामागे मानसिंगभाऊंचे द्रष्टे व विकासवादी नेतृत्व आहे. उद्योग समूहातील सर्व उद्योग व संस्था यशस्वीपणे चालवून शिराळासारख्या डोंगराळ तालुक्याला औद्योगिकरणाचा चेहरा दिला आहे. सन २०००पासून सहकाराबरोबर समाजकारण आणि राजकारणात पर्दापण केलेल्या भाऊंनी अल्पावधीत अमुलाग्र बदल घडवले. सहकारात बदलत्या काळानुरूप नवीन प्रकल्पांची, संस्थांची यशस्वीपणे उभारणी केली. आज विस्तारलेला ‘विश्वास’ व ‘विराज’ उद्योग समूहाचा परिघ त्याची प्रचिती देतो. सर्वसामान्य जनतेची प्रगती व बेरोजगारांच्या हाताला काम हाच एकमेव मूलमंत्र घेऊन काम करणार्या मानसिंगभाऊंनी संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अनेक प्रकल्पांची यशस्वी उभारणी :
आपला बझार, विराज इंडस्ट्रीज, फत्तेसिंगराव नाईक दूध संघ, विश्वासची डिस्टलरी, वीज निर्मिती प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, द्रवरूप जीवाणू खतनिर्मिती प्रकल्प, शिराळा कार्बन डायऑक्साईड गॅस बॉटलिंग प्रकल्प, ऊस बियाणे निर्मिती प्रकल्प, चिखली गॅसेस, विराज हायटेक विविंग, विराज पशुखाद्य निर्मिती, विराज सॅनिटायझर प्रकल्प, देशी व विदेशी मद्यनिर्मिती प्रकल्प, विराज रिफायनरी या प्रकल्पांची यशस्वीपणे उभारणी केली. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी काळाची गरज ओळखून कारखाना स्थळावर लोकनेते फत्तेसिंगराव नाईक (अप्पा) गांडूळ खत प्रकल्पाची उभारणी केली आहे.
सहकारातून समृध्दी :
आमदार मानसिंगभाऊंनी सहकारातील मूळ संस्था असलेल्या विश्वास कारखान्याचे व्यवस्थापन नेटके ठेवत कारखाना आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम केला. कर्मचारी पगारवाढ, प्रत्येकवर्षी बोनस, सभासदांना अल्पदरात साखर, रुग्णवाहिका व अग्निशामक टँकर, ठिबक सिंचन अनुदान योजना, कामगार विमा योजना, आदी सोयी-सुविधा निर्माण केल्या. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कारखान्यामार्फत विविध योजना राबवत सोयी, सवलती देऊ केल्या आहेत. कारखान्यामार्फत राबविण्यात आलेल्या विविध पाणी योजनांना शासनाकडून कर्जमाफी मिळवून बहुतांशी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. आता ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा संकल्प केला आहे. अल्पावधीत इथेनॉल निर्मिती होईल.
समाजकारणाला प्राधान्य :
सन २०००मध्ये विश्वास कारखान्याची सुत्रे हाती घेतल्यापासून सामाजिक उपक्रमात मानसिंगभाऊंचा सहभाग कायम आहे. औद्योगिक प्रगती झाल्याशिवाय बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही. पाणी मिळाल्याशिवाय शेती पिकणार नाही. ८० टक्के शेतकरी असलेली जनता विशेषतः महिलांच्याही प्रगतीसाठी शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे महत्त्वाचे आहे. शिवाय बचत गटांच्या माध्यमातून संघटित असलेल्या महिलांनी विविध छोटे-मोठे उद्योग, व्यवसायात यायला हवे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. फत्तेसिंगराव नाईक इंडोमंट ट्रस्टच्या माध्यमातून दुर्धर आजारावरील शस्त्रकियांसाठी आर्थिक मदत, कुपनलिका (बोअर), आरेाग्य शिबिरे, पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वहीवाटप, शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व परीक्षा, पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती योजना, रक्तदान, पत्रकार विमा योजना, कुमार-युवा साहित्य संमेलन, कीर्तन महोत्सव, खेळ पैठणीचा, मंगळागौरी स्पर्धा, स्वातंत्र्यसेनानी आनंदराव नाईक विशेष गुणवत्ता पुरस्कार, होम मिनिस्टर, कृषी प्रदर्शन आदी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. २०१९मध्ये वारणा नदीला पूर आल्यानंतर तीन हजार कुटुंबांना अत्यावश्यक साहित्यांच्या किटचे वाटप केले.
सक्षम लोकप्रतिनिधी :
२००९ ते २०१४ व २०१९पासून आजअखेर असा आमदार मानसिंगभाऊंचा कार्यकाळ. २००९ला ते पहिल्यांदा आमदार झाले. या कालावधीत त्यांनी ज्या गतीने शिराळा मतदार संघाचा विकास केला, असा विकास यापूर्वी जनतेने कधीच पाहिला नव्हता. सभागृह, काँक्रिट रस्ते, नाले, पाणंद रस्ते, पिण्याच्या पाणी योजना, कुपनलिका, पाईपलाईन, ग्रामपंचायत कार्यालय इमारती, ग्रामसचिवालय इमारतींची कामे मार्गी लावली. तीर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकास, शिराळ्यातील टोलेजंग मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत, सर्व सोयींनीयुक्त आय. टी. आय.मध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अत्यंत देखणी शिराळ्यातील बसस्थानक इमारत, शिराळा येथे ५० खाटांची उपजिल्हा रुग्णालय इमारत, बिळाशी, येळापूर, पाचगणी, चिकुर्डे, वाटेगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी, पाचगणी, खराळे, चिंचेवाडी व जाक्राईवाडी येथे आरोग्य उपकेंद्राला मंजुरी आणली. शिराळा औद्योगिक वसाहत, कणदूर, बिळाशी व करंजवडे येथील वीज केंद्र, शिराळा शहराचा पर्यटन विकास, वाकुर्डे बुद्रुक योजनेला निधी मिळवून वारणेचे पाणी उत्तर भागातील वाकुर्डे तलावात आणले.
पुन्हा विकासकामांचा धडाका :
२०१९च्या विधानसभेला मतदार संघातील जनतेने पुन्हा मानसिंगभाऊंच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. जबाबदारी घेताच मार्च २०२०मध्ये कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर आले. सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले, ते आजमितीस पूर्वपदावर आलेले नाही. असे असतानाही आमदार मानसिंगभाऊ यांनी मतदार संघातील विकासात सातत्य ठेवले आहे.
शिराळ्याच्या विकासासाठी इतिहासात प्रथमच एकावेळी ५ कोटी दिले. आणखी ५ कोटी मंजूूर केले आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्याने चांदोली धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. विनोबा ग्राम व धनगरवाडा येथील वन विभागाच्या नावावर असलेल्या शेतजमिनीबाबत निर्णय केला आहे. चांदोलीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात आहेत. चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांसाठी जंगल सफारी मार्ग सुरू केले आहेत. शिराळा येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासह त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी चित्रसृष्टी उभारण्याचे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
मजबूत पक्ष संघटन :
शिराळा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे. कार्यकर्त्यांशी जवळीक व सतत संपर्क हे त्याचे मुख्य कारण आहे. सर्वांच्या सुख-दुःखात, आनंदात, सभा, समारंभात मानसिंगभाऊंना निरोप पोहोचला आणि ते आले नाहीत, असे नाही. वेळात वेळ काढून उपस्थिती लावतातचं. यामुळेच मतदार संघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, ग्रामपंचायती, सोसायट्या, नगर पंचायत आदी ठिकाणी मंत्री जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने विरोधकांना पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतदार संघातील जनतेचा प्रथम क्रमांकाच्या पसंतीचा व सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आहे. वेळोवेळी पक्षाने तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर केलेल्या अनेक आंदोलनात, मोर्चात, समारंभात मानसिंगभाऊंचा सक्रिय सहभाग राहिला आहे. मतदार संघातील जनतेने दिलेले प्रेम, दाखवलेला विश्वास व जिव्हाळा कायम आहे.
लोकनेत्याचे स्मरण :
शिराळा विधानसभा मतदार संघ व शाहुवाडी तालुक्यातील जनकल्याणासाठी अविरत प्रयत्न करणारे भाग्यविधाते लोकनेते फत्तेसिंगराव नाईक (अप्पा) यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी विश्वास कारखाना स्थळावर पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी केली आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात स्व. अप्पांच्या कार्याचा गौरव सर्व मान्यवरांनी केला. विशेष करून त्यांचा वारसा चालवणाऱ्या आमदार मानसिंगभाऊंचे कार्य, कार्यशैली, मतदार संघातील जनतेसाठी धडपड, विकासाचा दृष्टीकोन व त्यामागची तळमळ प्रकर्षाने अधोरेखित केली. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे खूप काही सांगून गेली. त्यामुळे मानसिंगभाऊंनी लोकनेते फत्तेसिंगअप्पांचा समाजकारणाचा वसा व वारसा सक्षमपणे व दूरदृष्टीने चालविला आहे, असेच म्हणावे लागेल.
म्हणून मतदार संघातील जनतेचे मानसिगभाऊंवर प्रेम कायम आहे.
आमदार मानसिंगभाऊंचे भेटणे, आपुलकीने विचारपूस करणे. सुख-दुःखात सहभागी होऊन व संकटकाळी मदत करणे, ही कृती सर्वसामान्यांच्या मनात घर करते. निवडणुकीपुरते राजकारण मर्यादीत ठेवून इतरवेळी मतदार संघातील सर्व जनतेला आपलं कुटुंब मानणारा एक द्रष्टा लोकप्रतिनिधी असे मानसिंगभाऊंना म्हणावे लागेल. समाजाप्रति तुमच्या मनात असलेल्या भावना व ओढ अशीच कायम राहू दे. तुमची समाजमनावरची छाप कोणीही, कितीही प्रयत्न केले तरी त्यांना ती पुसता येणार नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
..................................................
शब्दांकन :
- संतोषकुमार भालेकर
प्रसिद्धी अधिकारी, विश्वास साखर)