माडग्याळ : करजगी (ता. जत) येथे गेल्या महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाणीपुरवठा त्वरित सुरळीत न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा जनता दलाचे तालुकाध्यक्ष मुन्ना पटेल यांनी दिला आहे.
करजगी गावची लोकसंख्या सुमारे सहा हजारांपर्यंत आहे. येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असून अंकलगी तलावातून पाणीपुरवठा होतो. मात्र, गेल्या महिनाभरापासून ट्रान्सफॉर्मर जळाल्याचे कारण सांगून पाणी बंद केले आहे. ट्रान्सफाॅर्मर बसवूनही बरेच दिवस झाले; परंतु पाणी सोडले जात नाही. याबाबत ग्रामसेवकाला विचारले असता, देान दिवस थांबा असे उत्तर दिले जात आहे. गावात लोकांना सध्या एक कि.मी. अंतरावर असलेल्या एका खाजगी शाळेच्या बोअरमधून पाणी आणावे लागत आहे. वृद्ध लोकांना पाणी आणणे अवघड झाले आहे. गावात कोठेही हातपंप नाही. पिण्याच्या पाण्यासाठी शाळेजवळ रांगेत उभे राहण्याची वेळ लोकांवर आली आहे. तलावातील विहिरीला पाणी असूनही ग्रामपंचायतीच्या हलगर्जी पणामुळे नागरीकाना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.