सांगली : ‘लोकमत’ बालविकास मंचतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच मार्गदर्शन देऊन उज्ज्वल भवितव्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले जाते. याचाच एक भाग म्हणून सध्या सातवी ते दहावीमधील विद्यार्थी व पालकांसाठी रविवार, दि. २१ रोजी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची जाणीव होऊन अभ्यासाचे महत्त्व समजेल आणि अभ्यासासंबंधीचे नियोजन व अंमलबजावणी अधिक सोपी होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आकडेमोड, ज्ञानाचा परस्पर संबंध, ज्ञानाचे उपयोजन आदी गोष्टींची गरज असते. या गरजा विद्यार्थ्यांना समजावून सांगून त्याचा सराव शालेय जीवनातून केला, तर स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का होईल. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होईल. या गोष्टी लक्षात घेऊन या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील विषय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. इयत्ता सातवी, आठवी व नववीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘उज्ज्वल उद्यासाठी....दहावीसाठी शिक्षणाकडे झेपावताना’ या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच इयत्ता दहावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘दहावी बोर्ड परीक्षेच्या अंतिम टप्प्यातील तयारी व भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षा आणि संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)रविवार दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी १0. ३0 वा. मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये इयत्ता दहावीतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी तसेच सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठीही हे शिबिर होणार आहे. अधिक माहितीसाठी प्रकाश - ८४८२८३६१८0 या क्रमांकावर संपर्क साधावा.
उज्ज्वल उद्यासाठी...विशेष शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर
By admin | Updated: December 19, 2014 00:29 IST