इस्लामपूर : सध्या सुरू असलेल्या
कोरोना महामारीच्या काळात सगळीकडे रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. या पार्श्वभूमीवर येथील माणुसकीचं नातं या ग्रुपच्या वतीने शनिवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून होणार आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीस किमान चार महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्यामुळे रक्ताअभावी कुणाचा जीव जाऊ नये, ही गरज ओळखून हे रक्तदान शिबिर घेतले आहे. या शिबिरासाठी शहर आणि परिसरातील जवळपास ७०० हून अधिक युवक, युवती आणि नागरिकांनी नावनोंदणी केली आहे.
बहे रस्त्यावरील सर्जेराव यादव
मल्टिपर्पज हॉलमध्ये सकाळी ९ वाजता शिबिर सुरू होणार आहे. उद्योजक सर्जेराव यादव, प्राचार्य महेश जोशी, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, प्रा.डॉ. अशोक शिंदे हे या शिबिराचे संयोजन करत आहेत.