बुध्दिवादी विचारांची मांडणी करत कृतीतून समाजात परिवर्तन घडविणारे कमीच, मात्र, गेल्या पंचवीस वर्षांपासून ‘अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्रा’च्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रुढी-परंपरा आणि चाली-रितीविरोधात आपले मत मांडणाऱ्या या मासिकाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने येत्या शनिवार, दि. १४ व १५ मे रोजी सांगलीत दुसऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संपूर्ण देशातील पुरोगामी विचारांच्या विचारवंतांना एका व्यासपीठावर आणण्यात संयोजक यशस्वी झाले आहेत. विवेकवादी विचारातून समाजात परिवर्तन करु पाहणाऱ्या या संमेलनाच्या पाश्वभूमीवर ‘अंनिवा’मासिकाचे संपादक प्रा. प. रा. आर्डे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : सध्या चळवळीसमोर कोणत्या अडचणी आहेत, असे वाटते?उत्तर : हो, निश्चितच आहेत. सध्या राज्यात ३५० केंद्रांच्या माध्यमातून अखंडपणे काम सुरु आहे. मात्र, सध्या समिती ज्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा, विवेकाचा प्रचार करत आहे, त्यास विरोध करणाऱ्या शक्तींकडून चळवळीबाबत अपप्रचार सुरु आहे. या विवेकवादी चळवळीतून सत्याकडे नेणारा प्रवास होत असताना त्याचे भय या शक्तींना असल्याने त्यांचा विरोध होत आहे. सध्या काही संघटनेकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरुच आहे. मात्र, आमचे कार्यकर्ते या विरोधाला खंबीरपणे तोंड देत आहेत. संघटनात्मक पातळीवर बांधिलकी जपत असताना त्यात थोडाफार विस्कळीतपणा जाणवतो. यामुळे स्वयंस्फूर्तीने सहभागी कार्यकर्त्यांचा उत्साह मावळतो. या काही अडचणी मांडता येतील. प्रश्न : अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीचे आजपर्यंतचे फलित काय?उत्तर : समाजाचे शोषण करणाऱ्या अंधश्रध्दांचे निर्मूलन व्हावे, यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी सादर केलेला कायदा मंजूर झाला. हे संघटनेचे सर्वात मोठे यश आहे. ‘जादूटोणा आणि नरबळी प्रतिबंधक कायद्या’मुळे दोन वर्षात शंभरावर खटले दाखल झाले व जनतेची होणारी फसवणूक रोखली गेली, हे चळवळीचे फलितच म्हणावे लागेल. जनमानसाचे प्रबोधन करण्यात हा कायदा यशस्वी ठरला. लोक स्वत: पुढे येत असल्याने अघोरी प्रथांना चाप बसला आहे. जातपंचायतीच्या विरोधात केलेला कायदाही ‘अंनिस’च्या पाठपुराव्यामुळेच संमत झाला आहे. सध्या महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलने होत असली तरी, १९९५ ला डॉ. दाभोलकरांसह डॉ. श्रीराम लागू, एन. डी. पाटील, पुष्पा भावे आदींनी शनिशिंगणापूरला पहिला सत्याग्रह केला होता. हाच लढा आता प्रबळ ठरल्याने परिवर्तन होऊ शकले, हे चळवळीचे फलितच मानावे लागेल. प्रश्न : डॉ. दाभोलकर यांच्यानंतरची ‘अंनिस’ची चळवळ कशी आहे? उत्तर : या विवेकवादी चळवळीत सहभागी होणारे कार्यकर्ते हे स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आले आहेत. समाजातील काही विशिष्ट घटकांकडून विरोध होत असला, तरी त्याचा खंबीरपणे सामना करत आपले कार्य नि:स्पृहपणे करत आले आहेत. डॉ. दाभोलकरांनी चळवळीतील कार्यकर्त्यांना विचाराने पक्के केले आहे. चळवळ पुढे गेली पाहिजे, हे सांगायचीही गरज कोणाला भासली नाही. उलट त्वेषाने कार्यकर्त्यांनी सहभाग वाढवत चळवळ वाढविण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच जात पंचायतीचा कायदा संमत होऊ शकला. डॉ. दाभोलकरांची उणीव असली तरी, त्याच तडफेने काम सध्या सुरु आहे. प्रश्न : साहित्य संमेलनाच्या माध्यमातून परिवर्तनाचे कोणते कार्य साध्य होईल, असे तुम्हाला वाटते?उत्तर : समितीचे कार्यकर्ते आजवर आपली विवेकनिष्ठ भूमिका मांडत आले आहेत. त्यामुळे या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समितीचे तत्त्वज्ञान व प्रबोधनाचे माध्यम म्हणून या संमेलनाकडे पाहण्यात येते. समितीकडून वर्षातून एकदा अधिवेशन घेत समाजात अंधश्रध्दा निर्मूलनाचे प्रचाराचे काम सुरु आहे. प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी चळवळीला नवे रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या समाजात सुरु असलेल्या फसव्या विज्ञानाचा अतिरेक मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी संमेलन महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास वाटतो. प्रश्न : प्रशासकीय पातळीवर चळवळीला सहकार्य मिळते का ? उत्तर : प्रामाणिकपणे सांगावयाचे झाल्यास शासनाकडून व प्रशासनाकडून चळवळीला सहकार्यच मिळत आले आहे. या सरकारने पारित केलेला जात पंचायतीचा कायदा याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र, या सरकारकडून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाकडे आणि खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात अपयश येत आहे. सरकारची ही भूमिका वेदनादायी आहे.- शरद जाधव, सांगली
समाज परिवर्तनात ‘अंनिस’ची भूमिका महत्त्वाची
By admin | Updated: May 12, 2016 00:14 IST