सहदेव खोत -पुनवत सांगली जिल्ह्यातील पावसाचे आगर म्हणजे शिराळा तालुका. आषाढ, श्रावणात कधी तुफानी, तर कधी श्रावणसरींनी बरसणाऱ्या वरुणराजाने सध्या तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. दिवसभर अधूनमधून कडक ऊन, तर कधी पावसाची रिमझिम आणि रात्री पाऊलवाटा स्पष्ट दिसाव्या असे लख्ख चांदणे... गेल्या महिन्याभरापासून निसर्गाचे असे विचित्र रूप पाहण्याचा योग तालुकावासीयांच्या वाट्याला आला आहे.शिराळा तालुका म्हणजे जिल्ह्यात निसर्गाचे वरदान लाभलेला तालुका. येथील डोंगर-दऱ्या, चांदोली धरण परिसर, वारणा नदीची ठिकठिकाणांहून दिसणारे विलोभनीय दृश्य अशा विविध गोष्टींमुळे तालुका जणू नजरेतच भरत असतो.पावसाळ्यात तर येथे दिसणारे मोहक दृश्य सर्वांनाच सुखावणारे असते. मात्र यंदाच्या पावसाळ्यात मात्र आषाढ - श्रावणातील आनंददायी रूप लुप्त झाल्याचे जाणवत आहे. फक्त चांदोली धरण परिसरात जेमतेम पाऊस असल्याने वारणेला समाधानकारक पाणी आहे. आषाढ संपला, श्रावण सरत चालला तरी पाऊसच झाला नाही. त्यातच पावसाची तरणा, म्हातारा ही नक्षत्रेही कोरडीच गेली आहेत.वारणा नदी सोडली तर ओढे, नाले, तलाव, तळी, कालवे यात समाधानकारक पाणी नाही. पावसाळ्यात तुडुंब असणारे पाण्याचे हे स्रोत कोरडेच आहेत. दिवसभर ऊन, अधूनमधून केव्हातरी फक्त रिमझिम व रात्री पाऊलवाटा स्पष्ट दिसाव्या असे लख्ख चांदणे असे विचित्र वातावरण तालुक्यात दिसत आहे. पावसाळ्यात तुडुंब असणारा वारणा डावा कालवा कोरडा ठप्प पडला आहे.तालुक्यात शेतीपिके कशीतरी तग धरून आहेत. विचित्र वातावरणामुळे नागरिकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला आदी आजारांनीही पछाडलेले आहे. ऐन पावसाळ्यात पावसाचे आगरच पावसापासून वंचित असल्याने, नागरिक, पर्यावरणप्रेमी, पर्यटक, शेतकरी यांचा आनंद हरवला आहे. पर्जन्याचे ढग हटून चिंतचे ढग तालुक्यातील शेतकरी, नागरिकांच्या डोईवर आले आहेत. पाणपक्ष्यांचे स्थलांतर?तालुक्यात नदी, तलाव, कालवा यामध्ये समाधानकारक पाणी नसल्याने प्रतिवर्षी पावसाळ्यात पाण्याजवळ आढळणारे पाणकावळा (करढोक), खंड्या (किंगफिशर), काळे-पांढरे पाणबदक, लहान-मोठे बगळे, पाणकोंबड्या यासारखे पाणपक्षी नजरेस पडेनासे झाले आहेत. पाऊस नसल्याने त्यांनी स्थलांतर केल्याचे जाणवत आहे.
आषाढ-श्रावणातील आनंदघन लुप्त
By admin | Updated: August 26, 2015 23:07 IST