शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली अभयारण्यातील जैवविविधतेचा आनंद पर्यटकांना मिळण्याकरिता व येथील पर्यटनाबरोबर रोजगार वाढीसाठी आम्ही लोकप्रतिनिधी असताना सुचविलेले मुद्दे राज्य सरकारने प्राधान्याने विचारात घेऊन चांदोली परिसर व अभयारण्याचा पर्यटनाच्या दृष्टीने लवकरात लवकर विकास करावा, असे मत माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले, चांदोली परिसरामध्ये असणारी बरीचशी जमीन पाटबंधारे विभागाच्या मालकीची आहे. यामध्ये विशेष करून सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. विविध विभागांना लागणारी जमीन पाटबंधारे विभागाने समन्वयातून प्राप्त परिस्थितीनुसार त्या-त्या विभागाला भाडेकरारानुसार किंवा कायमस्वरूपी द्यावी. चांदोली प्राधिकरण या स्वतंत्र विभागाची निर्मिती करून या परिसरामध्ये मत्स्यालय, सर्पोद्यान, पैठण व म्हैसूरच्या धर्तीवर बगीचा, एमटीडीसीमार्फत पर्यटकांच्या निवासाची व भोजनाची, वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध करावी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पशू, पक्षी, प्राणी, वनस्पती या सर्वांची माहिती होण्याकरिता स्वतंत्र संग्रहालय उभे करावे.
वनविभागाने पर्यटनसंबंधी विशेष बाब म्हणून जलाशयाच्या बाजूने असणारा हा रस्ता उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून पर्यटकांना अभयारण्यात १५ किलोमीटरपर्यंत येथील सृष्टिसौंदर्याचा आनंद घेता येईल, अशी मागणी केली होती. यातील जलाशयाशेजारील जनीच्या आंब्यापासूनचा रिंग रोड आता पूर्ण होत आला आहे.
चाैकट
‘पाटबंधारे’च्या जागा मिळाव्यात
एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयातून विशेष लक्ष घालावे. पाटबंधारे विभागाकडे जमीन उपलब्ध व वापराविना शिल्लक आहे. चांदोली पर्यटनासाठी जागा देऊनही त्यांच्याकडे जमीन शिल्लक राहणार आहे.
महाबळेश्वरपाठोपाठ दक्षिण महाराष्ट्रात पर्यटनासाठी प्रचंड वाव असणारा चांदोली परिसर आहे. यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शिवाजीराव नाईक यांनी केली आहे.