सांगली : कडक निर्बंधांमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तरीही काहीजण अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली फिरताना आढळून येत आहेत. त्यातही काहीजण बनावट ओळखपत्र घेऊन फिरत असल्याच्या तक्रारी येत असून त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
कडक निर्बंध लागू असताना अनेकजण अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली बनावट ओळखपत्र घेऊन फिरत आहेत. नागरी भागात असे प्रकार जादा घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, अत्यावश्यक कारणांसाठीच सध्या बाहेर फिरण्यास परवानगी असताना, अनेकजण रस्त्यावर दिसून येत आहेत. पोलिसांकडून प्रबोधन करण्यात येत असले तरी, आता कारवाईशिवाय पर्याय नाही. अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर पडणाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे अथवा ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या अनेकजण बनावट ओळखपत्र घेऊन फिरत असल्याचे समजत असल्याने अशांवर कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात येतील. पोलिसांसह महापालिका प्रशासनालाही याबाबतच्या सूचना देणार असून कोणीही असा गैरवापर करू नये व नियमांचेही उल्लंघन करू नये.