आटपाडी : आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी तात्काळ सोडा आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा, या मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी येथील तहसील कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढण्यात आला. येथील मुख्य बसस्थानकासमोर क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. मुख्य व्यापारी पेठेतून घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. डॉ. भारत पाटणकर म्हणाले, आटपाडीच्या जनतेने टेंभू योजनेच पाणी मोठ्या कष्टाने आणले; पण हे पाणी सोडण्यासाठी मोर्चा काढावा लागत आहे. येत्या आठ दिवसात टेंभू योजनेचे पाणी तालुक्यात शक्य तिथे देण्याचे नियोजन करा. येथील शेतकरी पाणीपट्टी भरायला तयार आहेत. जिथे टेंभूचे पाणी जात नाही, तिथे पिण्याच्या पाण्याचे टॅँकर आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात सप्टेंबर अखेरपर्यंत तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्यासाठी शासनाने ५०० कोटी निधी द्यावा. यावेळी आनंदराव पाटील, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड, माजी जि. प. सदस्य अण्णासाहेब पत्की, हरिभाऊ माने, राहुल गुरव, प्रदीप पाटील, हणमंतराव देशमुख, मनोहर विभूते, दाजी देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलकांनी चारा छावण्यांच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर जनावरे बांधली. (वार्ताहर)
टेंभूच्या पाण्यासाठी आटपाडीत मोर्चा
By admin | Updated: August 24, 2015 23:43 IST