सांगली : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातील विविध मार्गावर दर दोन तासाला एक बस सोडण्यात येणार आहे. या बसेस केवळ रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी राहतील, असे विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी सांगितले.
एसटीच्या सांगली विभागातील दहा आगारातून रोज ४०३ बसेसच्या फेऱ्या होत होत्या. शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन असल्यामुळे घरातून कोणीही बाहेर पडणार नाही. अत्यावशक गोष्टी वगळून बाहेर पडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. या दोन दिवसांत ग्रामीण भागातून औषधोपचारासाठी शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था व्हावी, म्हणून दहा आगारांतून ४६ बसेस सोडण्यात येणार आहेत. विटा, जत, आटपाडी, शिराळा, कडेगाव, पलूस आदी मार्गावर दर दोन तासाला बसेस सोडण्याचे नियोजन आहे, असेही वाघाटे यांनी सांगितले.
चौकट
हॉटेल बंद असल्यामुळे चालक, वाहकांची जेवणाची गैरसोय
राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिक, औरंगाबाद, पुणे मार्गावर बसेस घेऊन जाणाऱ्या चालक, वाहकांच्या जेवणाची गैरसोय होत आहे. याबद्दल चालक, वाहकांनी एसटी कामगार सेनेचे विलास यादव यांच्याकडे शुक्रवारी तक्रार केली. यादव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या चालक, वाहकांची गैरसोय टाळण्यासाठी बस घेऊन जाणाऱ्यांनाच पुन्हा परत आणण्यासाठी परवानगी द्यावी, म्हणजे त्यांच्या जेवणा, राहण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी मागणी केली.