इस्लामपूर/वाळवा : गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते दळणवळणाअभावी वाळवा तालुक्याच्या संपर्कापासून दूर राहिलेल्या शिरगावकरांची रस्ते पुलाची मागणी मान्य झाली आहे. कृष्णा नदीवरील पुलाची मागणी पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत असून त्यासाठी केंद्रीय मार्ग निधी योजनेंतर्गत ३४ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती स्वत: जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
कृष्णा नदीला पूर आल्यानंतर शिरगाववासीयांचा तालुक्याशी संपर्क तुटत होता. इस्लामपूर मतदारसंघातील शिरगाव हे एकमेव गाव कृष्णा नदीच्या पलीकडे आहे. पावसाळ्यात तेथील नागरिकांना दळणवळणाच्यादृष्टीने गैरसोय होत होती. त्यामुळेच पालकमंत्री पाटील यांनी नागरिकांच्या पुलाच्या मागणीचा केंद्राकडे पाठपुरावा केला. आता केंद्रीय मार्ग निधी योजनेंतर्गत या मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ३३.८७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
याशिवाय केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत आष्टा-दुधगाव-कुंभोज पुलापर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या कामालाही ३.९६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आष्टा - दुधगाव परिसराचा थेट कोल्हापूर जिल्ह्याशी दळणवळणासाठी संबंध येणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे. पुलाची मागणी मान्य झाल्याने शिरगाववासीयांनी पालकमंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत.