रत्नागिरी : कोरोनामुळे एप्रिलपासून लाॅकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर मंदिरेही भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. हिंदू धर्मीयांमध्ये व्रतवैकल्याचा महिना म्हणून ‘श्रावण’ ओळखला जातो. दर सोमवारी उपवास ठेवल्याने भाविक दर्शनासाठी शिवमंदिरात जातात. परंतु गतवर्षीही कोरोनामुळे मंदिरे बंद होती. यावर्षीही गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे श्रावणात तरी खुली होतील का? यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दि. ९ ऑगस्टपासून श्रावण सुरू होणार आहे. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवार असून महिनाभरात पाच सोमवार आहेत. एक्का, नामसप्ताहाचे मंदिरातून आयोजन करण्यात येते. गतवर्षी मोजक्या पाच व्यक्तींमध्ये एक्का, जागर, नामसप्ताहासाठी परवानगी देण्यात आली होती. यावर्षी अद्याप परवानगी नाही, मात्र गतवर्षीप्रमाणेच मिळण्याची शक्यता आहे. भाविकांना दर्शनाकरिता प्रवेश बंद असून किमान श्रावणात तरी भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याची मागणी होत आहे.
श्रावणात दर सोमवारी भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे महिनाभरात फुले, हार, नारळ, अगरबत्ती देवासाठी आवर्जून खरेदी करतात. मात्र गतवर्षी श्रावणात मंदिरे बंद होती, शिवाय नऊ महिने मंदिरे बंद असल्याने व्यवसायावर परिणाम झाला होता. यावर्षीही अद्याप मंदिरे बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
- प्रकाश सावंत, व्यावसायिक
व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जाणारा श्रावण दि. ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे मंदिरे अद्याप बंद आहेत. महिनाभर मंदिरात पूजाअर्चा, नामसप्ताह, जागर, एक्का यासारखे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली असताना मंदिरे खुली करण्याची मागणी होत आहे.
पूजेचे साहित्य विकून उदरनिर्वाह चालतो. मात्र गेल्या वर्षापासून मंदिरेच बंद असल्याने व्यवसाय बंद आहे. श्रावणात तर मंदिरात एक्का, नामसप्ताहाचे आयोजन केले जात असल्याने भाविकांची वर्दळ सुरू असते. व्यवसाय बऱ्यापैकी होतो, दीड वर्षे व्यवसाय मोडीत निघाला आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- दीक्षा पवार, व्यावसायिक
व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जाणारा श्रावण दि. ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे मंदिरे अद्याप बंद आहेत. महिनाभर मंदिरात पूजाअर्चा, नामसप्ताह, जागर, एक्का यासारखे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली असताना मंदिरे खुली करण्याची मागणी होत आहे.