मंडणगड : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत २० जुलै २०२१ रोजी तालुकास्तरीय आढावा सभेचे पंचायत समितीचे मंडणगड येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका शिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तालुक्यात मागासलेल्या विकासाच्या अनुशेषाच्या मुद्द्यामुळे ही सभा वादळी ठरण्याची शक्यता अधिक आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्व विषय समितीच्या सभापती तसेच प्रशासकीय कार्यालयांचे प्रमुखही या सभेला हजर राहणार आहेत. निसर्ग चक्री वादळात नुकसानग्रस्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचा विषय गेल्या एक वर्षांपासून ऐरणीवर आहे. तालुक्यास मिळालेला तुटपुंजा निधी व नुकसानग्रस्त शाळांची संख्या लक्षात घेता या विषयावर विविध स्तरातून समस्या मांडली गेली आहे.
त्यातही तालुक्यास प्राप्त झालेल्या अल्पस्वल्प निधीचे वाटपातही नुकसानाचे अग्रक्रमाला डावलत राजकीय प्रभावाखाली निधीचे वाटप झाल्याने पूर्णतः नुकसानग्रस्त झालेल्या तालुक्यातील ११ शाळांना निधीच प्राप्त झालेला नाही, संभाव्य समायोजन प्रक्रियेमुळे बंद होण्याची शक्यता असलेल्या तालुक्यातील १९ शाळांचे भवितव्य अंधारात गेले आहे. दरवर्षी घटणारे शेती खालील क्षेत्र, कोविडमुळे आरोग्य विभागात निर्माण झालेली आणीबाणी, भिंगळोली ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार व त्यावरील तक्रारी आदी प्रश्न या सभेत मांडण्याची शक्यता आहे. तालुकाच्या विकासात्मक प्रक्रियेत शेवटचा तालुका म्हणून कायम दुर्लक्षित ठेवलेले असताना अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या माध्यमातून तरी तालुक्याला योग्य न्याय मिळणार का याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.