राजापूर : रिफायनरी प्रकल्प कोकणात राहणार की विदर्भात जाणार या विषयावरून दोन दिवस जोरदार मंथन सुरू असतानाच प्रस्तावित रिफायनरीच्या समर्थनार्थ आता प्रकल्प क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायती पुढे सरसावल्या आहेत. तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाचलने रिफायनरीच्या समर्थनाचा एकमुखी ठराव मंजूर करून तालुक्यातच प्रकल्प राहावा, अशी मागणी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांत उठावदार कामगिरी करताना शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पाचल ग्रामपंचायतीने राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ एकमुखी ठराव केला आहे. मंगळवारी (दि. २९) पाचल ग्रामपंचायतीच्या बैठकीत तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा मुद्दा चर्चेत आला. कोविडमुळे निर्माण झालेला रोजगारीचा प्रश्न पाहता रिफायनरी प्रकल्प होणे ही काळाची गरज असून, त्याच्या समर्थनाचा ठराव पाचलचे उपसरपंच किशोर नारकर यांनी मांडला. त्याला पाचलचे ज्येष्ठ सदस्य शंकर ऊर्फ अण्णा पाथरे यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी उपस्थित असलेल्या सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मत व्यक्त केले आणि एकमताने प्रस्तावित रिफायनरीचा ठराव मंजूर झाला.
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी आता राजापूर तालुक्यात जनजागृती होऊ लागली असून, प्रकल्प मार्गी लागावा म्हणून ठरावही करण्याचा निर्णय विविध ग्रामपंचायतींनी घेतल्याचे समजते.
चौकट
कोविडच्या महामारीमुळे रोजगारीबाबत निर्माण झालेली परिस्थिती, प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रोजगारासाठी उपयुक्त ठरणारा आहे. शिवाय तालुक्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. त्याचा विचार करून आम्ही रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारा ठराव मंजूर केला आहे.
- शंकर ऊर्फ अण्णा पाथरे, ग्रामपंचायत सदस्य, पाचल