रत्नागिरी : आज रत्नागिरीत संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू झाले आहे. भविष्यात पीपीई मॉडेलवर रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न असून, मुख्यमंत्र्यांनी त्या प्रस्तावास मंजुरी द्यावी, अशी विनवणी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या उदघाटनावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे शनिवारी उदघाटन करण्यात आले. यावेळी ते पुढे म्हणाले की, पैठण येथे संतपीठाची सुरुवात व आज संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्राची रत्नागिरी येथे होत असलेली सुरुवात हे दोन सुवर्ण क्षण आहेत, असे सांगून रत्नागिरीमध्ये लवकरच अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. आज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते महाराष्ट्रातील संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्राचे उद्घाटन होत आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. महाराष्ट्रातला हा दुसरा सुवर्ण दिवस असून, कोकणातल्या इतिहासातला हा पहिला सुवर्ण दिन आहे, असेही मंत्री सामंत म्हणाले.
दोन वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेज सुरू व्हावे, अशी इच्छा होती. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पावणेदोनशे कोटी रुपये खर्च करून याचवर्षी जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने देशातले पहिले रिसर्च सेंटर रत्नागिरी जिल्ह्यात होत असून, अशाप्रकारे अनेक उपक्रम जिल्ह्यात सुरू करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डाॅ. श्रीनिवास वरखेडी म्हणाले की, देशात १८ संस्कृत विद्यापीठे असून, त्यापैकी एक महाराष्ट्रात रामटेक येथे असल्याची माहिती दिली. ज्ञानदान, विकास आणि राेजगार संधीची उपलब्धता करून देणारे हे संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र समाजोपयोगी संसाधनांच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरेल, असे डाॅ. वरखेडी यांनी विश्वास व्यक्त केला. संस्कृत विद्यापीठाची पुणे, परभणी, जळगाव व ठाणे येथे भविष्यात उपकेंद्रे स्थापन करण्याचे नियोजन असून, त्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा डॉ. वरखेडी यांनी व्यक्त केली.
----------------------
हितचिंतकांना चिमटा
रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्रासाठी जागा कशाप्रकारे घेतली, कशासाठी घेतली. याबद्दल आपले हितचिंतक फार उहापाेह करीत आहेत. काही वर्षांपूर्वी ही जागा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एका डेव्हलपरला बांधकामासाठी दिली होती. परंतु, आघाडीचे सरकार आल्यानंतर ही जागा त्या डेव्हलपरकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परत घेतली असून, त्या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम सुरू व्हावा, त्याच्यातून हे उपकेंद्र येथे सुरू होत असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
--------------------------------------
आयसीडीसीची शाखा बनविणार
आयसीडी नावाची संस्था असून, त्याचा एक कॅम्पस मॉरिशसमध्ये, तर दुसरा कॅम्पस आसाम, तिसरा जालनामध्ये आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथील मुलांना स्कील डेव्हलपमेंट करण्यासाठी तसेच वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आयसीडीसीची शाखा बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांनी सांगितले.
------------------------------------
रत्नागिरीतील सर्व सर्कल सुशाेभित करणार
रत्नागिरी शहरातील सर्वच सर्कलचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याचे काम जे. जे. आर्ट ऑफ स्कूलकडे देण्यात आले आहेत. त्यासाठी साडेतीन कोटी मंजूर झाले असून, त्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.