सुभाष कदम: चिपळूणमहाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे सध्या कोयनेच्या चौथ्या टप्प्यातील वीज निर्मिती बंद असून जेमतेम पिण्यापुरते पाणी सोडले जात आहे. ही स्थिती अशीच राहिली तर भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. १९६०मध्ये वीजनिर्मिती करण्यासाठी व पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग ओलिताखाली आणण्यासाठी १०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेल्या या धरणाची निर्मिती करण्यात आली. १९९५मध्ये ७.८९ टीएमसी व १९९६ मध्ये १०.६६ टीएमसी निचांकी पाणीसाठ्याची नोंद झाली होती. त्यानंतर आता १९ वर्षाने १४.५४ टीएमसी पाणीसाठा उरला आहे.कोयना धरणाने गेल्या २० वर्षात प्रथमच तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याखाली गेलेली गावे उघडी पडली आहेत. पावसाळा लांबल्याने पाण्याची भीषण टंचाई भासू लागली आहे. कोयना खोऱ्यात दरवर्षी पडणाऱ्या पावसामुळे धरण तुडुंब भरते. परंतु, यावर्षी पावसाने गुंगारा दिल्याने धरणाचा तळ दिसू लागला आहे. सध्या धरणामध्ये जे पाणी उपलब्ध आहे, त्या पाण्यावर धरणाच्या पायथ्यालगत असलेल्या पॉवर हाऊसमध्ये ४० मेगावॅट वीजनिर्मिती करुन दररोज १९० दशलक्ष घनमीटर पाणी सोडले जाते. सांगली पाटबंधारे विभागाने मागणी केल्याने प्रथमच त्यांच्या कोट्यातील २२ टीएमसी पाणी वापरण्यात आले.पाण्याअभावी महिनाभर चौथ्या टप्प्याची वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. पाऊस न आल्यास स्थिती अजून भीषण होईल.रत्नागिरी : जून संपत आला तरी पावसाचा पत्ताच नसल्याने आणि हवामान खात्याने जुलैअखेर पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पाऊस नसल्याने लावणीची कामे खोळंबली आहेत. परिणामी शेतकऱ्यांपुढे पंपाद्वारे पाणी आणून लावणी करण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढणार आहे, पण त्याचवेळी उत्पादन मात्र कमी होणार आहे.कोयना धरणातील पाणीसाठा अल्प असल्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भविष्यात वीज निर्मिती पुरेशी झाली नाही तर मात्र राज्यापुढे संकट उभे राहू शकते.मे महिन्याच्या शेवटापासूनच मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला आणि या पावसावर भरवसा ठेवून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र शेती जगविण्यासाठी शेतकऱ्यांपुढे शेतीपंपाशिवाय पर्याय राहिलेला नाही. जुलैअखेरपर्यंत पाऊस पडण्याचा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला, तर शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकू शकते. जुलैमध्ये लागवड न झाल्यास शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीपंपाव्दारे पाणी आणून लावणीची कामे आटोपण्याचा एकमेव पर्याय शेतकऱ्यांपुढे उरला असून त्यामुळे विजेची मागणी वाढणार आहे. केरोसीनवर चालणाऱ्या पंपासाठी केरोसीन उपलब्ध होत नसल्यामुळे वीजपंपाचाच पर्याय शेतकऱ्यापुढे शिल्लक राहिला आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढू शकते. मे महिन्यात राज्यात १९,००० मेगावॅट सर्वोत्तम विजेची मागणी नोंदविण्यात आली होती. सर्वसाधारणत १२,००० ते १२,५०० मेगावॅट विजेची मागणी सुरू आहे. मात्र पावसाअभावी वाढलेली उष्णता व शेती वाचविण्यासाठी विजेचा वापर वाढण्याची शक्यता आहे. परिणामी महावितरणची वितरण यंत्रणा विस्कळीत होण्याची आणि भारनियमनाची शक्यता आहे. या साऱ्यांमुळे वरूणराजाची सगळेच वाट पाहत आहेत. (प्रतिनिधी)
पावसाअभावी वीजटंचाईचा धोका
By admin | Updated: June 29, 2014 01:01 IST