राजापूर : राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर प्रकल्प परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, या आंदोलनात सर्व मच्छिमार उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवणार आहेत. नियोजित प्रकल्पाची पर्यावरणाची संपलेली मुदत, केंद्र व राज्यातील सत्तेतील सहभागी शिवसेनेचा प्रकल्पाला असणारा प्रखर विरोध यामुळे शनिवारी नक्की काय घडणार, याकडे लक्ष राहिले आहे.जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला अद्याप विरोध सुरूच आहे. जनहक्क सेवा समिती व शिवसेना यांच्यावतीने १२ डिसेंबरला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला ठाम विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनामध्ये जैतापूर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील दशकाहून अधिक काळ हा प्रश्न सातत्याने गाजत आहे. अणुसारख्या घातक पदार्थावर ऊर्जा निर्मिती करताना त्यातून होणारे रेडीएशन यामुळे परिसरातील फळबागा, भातशेती, मच्छिमारी व मानवी जीवनावर विपरीत परिणाम होईल, या भीतीने प्रकल्पाविरुद्ध चांगलाच लढा सुरु आहे. मात्र, मधल्या काही महिन्यात प्रकल्पात जाणाऱ्या जमिनींचे नुकसान भरपाईचे अनुदान हेक्टरी साडेबावीस लाख एवढे करण्यात आल्याने जनतेने शासनाकडून नुकसान भरपाईच्या अनुदानाचे धनादेश स्वीकारले. त्यामुळे प्रकल्पाविरुद्ध असणारा विरोध कमी होत असतानाच परिसरातील मच्छिमार बांधवांना नियमानुसार प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता नसल्याने त्यांचे भविष्यात अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे साखरीनाटेतील असंख्य मच्छिमारांचा प्रकल्पाला असलेला विरोध अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे शनिवारच्या जेलभरो आंदोलनाला मच्छिमार बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. त्यासाठी ते आपापल्या बोटी किनाऱ्यावर लावून सहभाग घेतील, अशी माहिती मच्छिमारांनी दिली. (प्रतिनिधी)विरोध कायम : बोटी किनाऱ्यावरनियोजित अणुऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून दिलेल्या पर्यावरणाच्या दाखल्याची मुदत संपली आहे. पर्यावरणाची संपलेली मुदत वाढवून देऊ नका, अशी मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी होत असलेल्या आंदोलनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.प्रकल्पाचे काम सुरूजैतापूर येथील प्रकल्पाला विरोध होत असला तरी या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी नियोजित जागेवर संरक्षक कठडाही उभारला आहे.
जैतापुरात आज जेलभरो आंदोलन
By admin | Updated: December 12, 2015 00:16 IST