दापोली : गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. जामगे येथील अनंत पवार यांच्या मालकीची झोपडी पडून नुकसान झाले. पहाटे पडणारा पाऊस दुपारच्या सत्रात कमी होतो व संध्याकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढतो.
खेडमध्ये पावसाचा कहर
खेड : गेल्या ४ दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे जगबुडी, नारिंगी, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. समाधनकारक पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत.
वैद्यकीय साहित्य वाटप
जैतापूर : राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत अणसुरे येथे महाराष्ट नवनिर्माण सेनेचे उपतालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर यांच्यातर्फे वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले. सरपंच रामचंद्र कणेरी, पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर उपस्थित होते.
दिवंगतांना श्रद्धांजली
राजापूर : तालुक्यातील विधान परिषदेच्या माजी सदस्या हुस्नबानू खलिफे यांच्या उपस्थितीत झालेल्या शोकसभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष जयवंत दुधवडकर व अन्य दिवंगत नेते, पदाधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
युवक तालुकाध्यपदी शिवलकर
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या रत्नागिरी तालुकाध्यपदी सिद्धेश शिवलकर यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी बशीर मुर्तझा, राजाभाऊ लिमये, सुदेश मयेकर, राजन सुर्वे उपस्थित होते.
पथदीप बंद
संगमेश्वर : संगमेश्वरातील ग्रामीण भागातील ३० पथदीपांची बत्ती अजूनही गुल आहे. ग्रामपंचायतीने ९६ पथदीपांची थकबाकी भरल्याने काही पथदीप चालू करण्यात आले आहेत. मात्र, १२६ पथदीपांची थकबाकी असल्याने महावितरणने ते बंद करण्यास सुरुवात केली आहे.
दापोलीत बैठक
दापोली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांची १९ जुलै रोजी दापोली येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सायंकाळी ५ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे.
कलमांचे वाटप
चिपळूण : अलोरे येथे मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड व्हावी आणि शेतकऱ्यांनी लावलेली झाडे जगवावीत यासाठी कोळकेवाडीचे माजी सरपंच नीलेश कदम यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आंबा कलमाची रोपे उपलब्ध करून दिली.
पूरग्रस्त भागाची पहाणी
दापोली : उन्हवरे परिसरात पावसामुळे उन्हवरे, वावघर, फरारे, येथील अनेक घरात पाणी शिरून मोठी हानी झाली. किराणा माल, हाॅटेल व्यावसायिकांचेही फार मोठे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता माजी आ. संजय कदम यांनी नुकतीच पाहणी केली.