एस. टी. फेऱ्या सुरू
राजापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर राजापूर आगारातून वडदहसोळ मार्गावर दोन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी ७.३० वाजता व दुपारी ३ वाजता या बस सुटणार असून, त्यानंतर राजापूरला परतणार आहेत.
रस्त्याची दुरवस्था
रत्नागिरी : तालुक्यातील निवळी ते जयगड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता, अशा प्रश्न निर्माण झाला आहे. छोट्या वाहनचालकांना तर यामुळे कमालीचा त्रास होत आहे. या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ सुरू असल्याने अपघाताला आमंत्रण मिळण्यापूर्वीच तातडीने रस्ता दुरूस्तीची मागणी होत आहे.
पोलिसांचे संचलन
राजापूर : ‘ईद ऊल अजहा’ अर्थात बकरी ईद बुधवार, दि. २१ रोजी साजरी करण्यात येणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राजापूर पोलिसांनी पथसंचलन केले. पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन करण्यात आले.
झाडी तोडण्याची मागणी
खेड : खेड व दापोली तालुक्यातील संगलट पोफलोणे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली आहे. त्यामुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाळ्यापूर्वी झाडी तोडण्यात आली नसल्याने ती वाढली आहे. ही झाडी तातडीने तोडण्याची मागणी होत आहे.