रत्नागिरी : सध्या व्हाॅटस्ॲपद्वारे दिव्यांगांसाठी विविध योजनांबाबत संदेश सर्वत्र पसरविला जात आहे. दिव्यांग व्यक्तींनी विविध योजनांसाठी समाजकल्याण विभागाकडे संपर्क साधण्याबाबतचा उल्लेख या संदेशात करण्यात आला आहे. तथापि, असा कोणताही अधिकृत संदेश जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून व्हाॅटस्ॲपच्या माध्यमातून प्रसिद्धीसाठी देण्यात आलेला नाही. हा संदेश खोडसाळ असून, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना देय असणाऱ्या योजनांच्या अंतर्गत देय सुविधांचे प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून संबंधित तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्राप्त करून घेतले जातात. सद्य:स्थितीत अशा कोणत्याही प्रस्तावांची मागणी समाजकल्याण विभागाकडून करण्यात आलेली नाही, असेही या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.