गुहागर : रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात विक्रांत जाधव यांच्यारूपाने गुहागर तालुक्याला पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाल्याने तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे.
विक्रांत जाधव यांनी, तालुक्यात भाजपचा हक्काचा गट समजल्या जाणाऱ्या अंजनवेल जिल्हा परिषद गटातून गेली अनेक वर्षे राजकारणात असणाऱ्या सुरेश सावंत यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी निसटता विजय विक्रांत जाधव यांना मिळाला होता. या गटावर भाजपचे एवढे वर्चस्व होते की, पालशेत भाग या गटात येत नसताना व त्यावेळी मित्रपक्ष शिवसेनेची नाराजी ओढवूनही भाजपचे प्रशांत शिरगावकर निवडून आले होते. विशेष म्हणजे यावेळी शिरगावकर यांना उपाध्यक्षपदही मिळाले. यापूर्वी तवसाळ गटातून निवडून आलेले दिलीप गडदे यांनी उपाध्यक्षपद भूषविले होते. यानंतर तवसाळ गटातूनच निवडून आलेले शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष महेश नाटेकर यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्षपद मिळाले व काही दिवसांसाठी प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
यावेळी मात्र गुहागर तालुक्यात विक्रांत जाधव यांच्यारूपाने पहिल्यांदाच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. यातूनच तालुक्याच्या विकास कामांना आणखी गती मिळेल, असे निश्चित मानले जात आहे.