चिपळूण : कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने घेण्यात येणारा रत्नागिरी पर्यटन महोत्सव यावर्षी चिपळूण शहरातील पवन तलाव येथे ७ ते ९ मे या कालावधीत होणार आहे. यावेळी कोकणातील विविध पैलूंचे दर्शन घडविले जाणार आहे. हा उत्सव दरवर्षी एका मतदारसंघात करण्याचे नियोजन आहे. गेल्यावर्षी रत्नागिरीत झाला, तर यावर्षी तो चिपळूणमध्ये होत आहे. आमदार सदानंद चव्हाण व उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला उत्सव समजून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.चिपळूण येथील पंचायत समितीच्या सभागृहात पालकमंत्री वायकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, सभापती स्नेहा मेस्त्री, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, मुख्य कार्यकारी अधिकारी पुसाळकर, उपविभागीय अधिकारी हजारे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, तहसीलदार वृषाली पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, गुहागरचे सभापती विलास वाघे, मंडणगडचे सभापती रेवाळे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या महोत्सवात कोकणातील कला संस्कृतीचे दर्शन, निसर्ग अभ्यास, आमराई सफर, अॅडव्हेंचर स्पोटर््स, रॉक क्लायविंग, क्रोकोडाईल सफारी, बोटिंग, स्कुबा डायव्हिंग, रिव्हर क्रॉसिंग, बर्मा ब्रिज, झॉरबी बॉल आदी विविध उपक्रम तसेच भविष्यातील पर्यटन विषयावर चर्चासत्र होणार आहेत. या महोत्सवाची सुरुवात ७ मे रोजी शोभायात्रेने होईल. त्यानंतर आरोग्य शिबिर तसेच विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व रांगोळी स्पर्धा होणार आहेत. ८ रोजी कोकणी शाकाहारी व मांसाहारी पाककला स्पर्धा, दि. ९ रोजी पुष्परचना स्पर्धा आयोजित केली आहे. (प्रतिनिधी)
महोत्सवासाठी सर्वांचे सहकार्य हवे
By admin | Updated: April 23, 2016 00:28 IST