लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : सोलगाव - बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आता सावधानता बाळगण्याची गरज असून, या भागात रिफायनरीचे पडघम वाजायला लागल्याने हमखास मुंबईतील एनजीओ दाखल होतील. त्यांचा रोखठोख समाचार घेण्यासाठी आमच्यासोबत सज्ज रहा, असा खणखणीत इशारा माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी दिला आहे.
काझी हे बारसू भागातील बागायतदार असून, गोवळ-शिवणे-बारसू रिफायनरी समर्थक समितीचे अध्यक्ष आहेत. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संपर्क साधून एनजीओंच्या कारवायांबाबत भूमिका मांडली. गावाबाहेरील एनजीओचे सदस्य व त्यांनी निर्माण केलेल्या संघर्ष समित्यांपासून कोणताही प्रकल्पाचे पडघम वाजायला लागले की संघर्ष समित्या स्थापन करण्यासाठी मुंबईस्थित दलाल कोकणात अवतीर्ण होतात, हा इतिहास आपण एन्रॉनपासून अगदी सलग जिंदल, फिनोलेक्स, आयलॉग, नाणार रिफायनरी इत्यादी प्रकल्पांपर्यंत सलगपणे पाहतो आहोत. आता बारसू येथे सरकारने कोणतीही रिफायनरी जाहीर केलेली नसताना संघर्ष समिती स्थापन करण्याची चढाओढ या एनजीओने लावलेली आहे. यांचा उद्देश हा प्रकल्प कंपन्यांबरोबर सेटिंगचा असतो, हे आता लपून राहिलेले नाही. जे आरोप अणुऊर्जा प्रकल्प, जिंदल, फिनोलेक्स तसेच अगदी आयलॉग जेटी प्रकल्पांकरिता लावण्यात आले, तेच आता बारसू - सोलगावच्या ग्रामस्थांना रिफायनरी प्रकल्पासंदर्भात सांगण्यात येतील, असे काझी यांनी सांगितले.
रिफायनरी प्रकल्पामुळे आम्लयुक्त पावसाची अफवा पसरवली जात आहे. मुंबईमध्ये मागील ७० वर्षे दोन रिफायनरी कार्यरत आहेत. या कालावधीत मुंबईत आम्लयुक्त पाऊस पडल्याची कुठेही नोंद नाही, परंतु याचे उत्तर त्यांच्यापाशी नाही. रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणात हजारो टन कोळसा जाळला जाईल व राख पसरेल, अशी यांची पत्रके फिरू लागली आहेत. मुंबईत असलेल्या दोन रिफायनरी प्रकल्पांतून मागील ७० वर्षांत राख कोठे पसरली? याचे उत्तर एनजीओंकडे नाही. माहुल येथील रिफायनरीच्या बाजूच्या झोपडपट्टी पुनर्वसन सोसायटीतील अव्यवस्थेचे दर्शन आता घडवले जाईल व त्याचे खापर रिफायनरीवर फोडले जाईल. मात्र, ही सोसायटी २०१२ साली अस्तित्वात आली तर रिफायनरी १९५२ साली अस्तित्वात आली. या रिफायनरीच्या आजूबाजूला असलेल्या इतर ५० ते ६० सोसायटींमधील सुंदर परिसराचे दर्शन घडवले जाणार नाही मात्र एकाच गलिच्छ सोसायटीतील अवस्थेचे चित्रण करून ग्रामस्थांना भडकावले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही प्रकल्पाचे पडघम वाजायला लागले की संघर्ष समित्या स्थापन करण्यासाठी मुंबईस्थित दलाल कोकणात अवतरतात. हा इतिहास आपण पुसण्यासाठी सज्ज झालो आहोत, असा इशारा काझी यांनी दिला आहे. नाणारमध्ये रिफायनरी नको तर ४२ उद्योग आणणारे दलाल आज कोठे आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.